Summary of the Book
विसाव्या शतकातील मराठी कथासंचिताचे प्रातिनिधिक दर्शन घडवणारे असे हे मराठीतील अग्रगण्य कथाकारांच्या निवडक कथांचे संकलन आहे. मराठी कथेची कलात्मक गुणवत्ता, जीवनदर्शनाचे तिचे सामर्थ्य यांची प्रचीती देणार्या या संग्रहाला कथापरंपरेतील स्थित्यंतरक्रमाचे ऐतिहासिक परिणामही आहे.
मराठी कथेची जडणघडण ज्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात होत गेली ते पर्यावरण, काळाच्या ओघात बदलत गेलेले त्याचे स्वरूप व संदर्भ आणि मराठी कथेतून मूर्त झालेल्या कलात्म तसेच जीवनविषयक जाणिवा, प्रवृत्तिप्रेरणा, तिच्यातील नागर, ग्रामीण, दलित, स्त्रीलक्ष्यी असे विविध प्रवाह यांच्या परस्पर अनुबंधांचा वेधही या संग्रहातून घेता येईल.
मराठी वाङ्मयीन संस्कृतीत कथा या साहित्यप्रकाराला एक खास स्थान प्राप्त झालेले आहे. प्रतिभाशाली कथाकारांची एक सातत्यपूर्ण परंपरा मराठीला लाभलेली आहे. मराठी वाचकांची वाङ्मयीन अभिरुची संपन्न करण्यात त्यांच्या लेखनाचा मोलाचा सहभाग आहे. मराठी कथेतील प्रयोगशीलता, नवसर्जनक्षमता या वैशिष्ट्यांमुळे ती नेहमीच जाणकार समीक्षकांच्या अभ्यासाचा व चिंतनाचा विषय झालेली आहे. मराठी कथेच्या शतकभराच्या वाटचालीचा विविधांगी, साक्षेपी परामर्श घेणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना ही या संग्रहाला मिळालेली एक यथोचित जोड आहे. लेखक-वाचक-समीक्षक या सर्वांशीच संवाद साधण्याची दृष्टी तिच्यामागे आहे.