Summary of the Book
अप्रिय (पण सत्य व हितकारक) लिहिण्याचे शेषराव मोरे यांनी जणू व्रतच घेतले आहे. तीन वर्ष दर शुक्रवारी `सामना’ दैनिकात त्यांनी लिहिलेल्या लोकप्रिय सदराचे नावच होतेः `अप्रिय पण...’. त्यातीलच काही लेखांचा हा संग्रह.
ज्यांची बांधिलकी सत्याशी असते ते कोणत्याच विशिष्ट विचारसरणीशी बांधील नसतात. म्हणून प्रचलित एखाद्या (प्रतिगामी, पुरोगामी, समाजवादी, हिंदुत्ववादी इ.) विचारसरणीच्या चौकटीत त्यांना बसविण्याचा अनाठायी प्रयत्न कोणी करू नये. हे लेख वाचून लेखक कोणत्या विचारसरणीचा आहे याचा तर्क करीत बसू नये.
म्हणूनच ते एकीकडे `शंकराचार्यांनी हिंदूंसाठी काय केले?’ म्हणून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवितात; यज्ञधर्मावर कठोर प्रहार करतात; संतपीठाच्या योजनेसंबंधात प्रश्र्न उपस्थित करतात. तर दुसरीकडे औरंगजेबाला `सेक्युलर’ व शिवाजीला `जातीय’ म्हणणार्या असगर अली इंजिनियरचे अंतरंग उघड करतात. एकीकडे `स्वदेशी’वर लिहिताना त्याच्या मुळाशी चातुर्वर्ण्याचे तत्त्व कसे आहे हे ते दाखवून देऊन हिंदुत्वनिष्ठांना दुखवितात, तर दुसरीकडे डॉ. झकेरियांचा अखंड भारताचा पुरस्कार कसा घातक आहे, तसेच मौलवींना राजकारणात आणण्यात अग्रमान मौ. आझादांकडे कसा जातो हेही ते दाखवून देतात.
प्रथमदर्शनी जे दिसते, रूढ आहे व जनमानसाला भावते त्यापेक्षा त्या गोष्टीचे अंतरंग कसे वेगळे आहे हे अप्रिय कथन करणे हा त्यांचा लेखनपिंडच आहे.
कोणतेही भाष्य न करता वा स्वतःचे निष्कर्ष न मांडता वाचकांच्या विचारार्थ एखादी गोष्ट जशी आहे तशी स्पष्ट करून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने या संग्रहातील `साने गुरुजींचा ग्रंथः इस्लामी संस्कृती’, `सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुधर्मगौरव’, `मुस्लिम स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा’ वा `बौद्ध व वैदिक धर्मीयांना दावत’ या लेखांचा उल्लेख करता येईल.
`अप्रिय’ असले तरी यातील वस्तुनिष्ठ व मूलगामी चिंतन असणारे अभ्यासपूर्ण लेख वाचकांना हितकारक व विचारप्रवर्तक वाटतील यात शंका नाही.
अभिनव निर्माण प्रतिष्ठान