Summary of the Book
`जे दर्पणी बिंबले’ हा नीरजा यांच्या कथालेखनाचा पहिला बहर आहे. हे लेखन प्रथमदर्शनीच त्यातील कथाबीजांमधील विविधतेमुळे तसेच असांकेतिकतेमुळे लक्ष वेधून घेते.
नीरजा यांच्या या कथा मूलतः स्त्रीलक्ष्यी आहेत. स्रीपुरुषनात्यातील अनेकविधतेचा, गुंतागुंतीचा आणि संदिग्धतेचा त्या वेध घेऊ पाहतात. प्राधान्याने मध्यमवर्गीय समाजातील विवाहसंबंधातल्या संवादविसंवादांचे, अर्थाचे आणि अनर्थाचे चित्रण त्यात केलेले असले, तरी त्या चौकटीपलीकडील स्त्रीपुरुषासंबंधआंचे वास्तवही लेखिकेने नजरेआड केलेले नाही. सहानुभावी संवेदनशीलतेने तसेच समतोल दृष्टीने घडवलेले असे हे जीवनदर्शन आहे.
आत्मसन्मानाचे व स्वसामर्थ्याचे भान जपणारी, आधुनिक संवेदनस्वभाव असलेली स्त्री, तिचा दृष्टिकोण हा या कथांच्या निर्मितीतला एक केंद्रवर्ती घटक आहे. वादाच्या, संघर्षाच्या मोलाचे यथोचित भान राखून व्यक्त केलेली संवादाच्या, समन्वयाच्या अर्थपूर्णतेची जाणीव हे या दृष्टिकोणाचे खास वैशिष्ट्य आहे.
मानवी जीवनातील एकाकीपण आणि कारुण्य यांचा वेध घेणारी ही कथा माणसामाणसांतील आणि माणूस व निसर्ग यांतील आश्र्वासक संवादाचे चित्रणही साधते. संयतता व व्यंजकता हा या चित्रणाचा एक उल्लेखनीय विशेष आहे आणि याचे नाते उघडपणेच या कथेला असलेल्या काव्यात्मतेच्या परिमाणाशी आहे.
नीरजा यांच्या यापुढील कथाप्रवासाविषयी खास उमेद बाळगावी असे आश्र्वासन या संग्रहात खचितच आहे.
- सुधा जोशी