Summary of the Book
वक्तृत्त्व, नेतृत्त्व व कर्तृत्त्व यांचा सुंदर मिलाफ मा. राजारामबापूंच्या ठायी झालेला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मार्दव, वाणीत आर्जव, विचारांत ठामपणा व कृतीत खंबीरपणा होता. बापूंच्या जीवनसागरात समाजकारण, शिक्षण, सहकार, राजकारण, अर्थकारण असे विविधांगी ज्ञानप्रवाह एकमेकांमध्ये मिसळून गेले होते, एकरूप झाले होते. याद्वारे चिंतन, वाचन, व श्रवणातून स्फुरलेले सत्य मोत्याप्रमाणे तेजस्वी, ओजस्वी भाषेत सर्वांसमोर मांडावे हा त्यांचा स्वभावधर्म होता. तर योग्य वेळी समर्पक शब्दात, सौम्य पण अभ्यासपूर्ण वक्तव्य हा त्यांचा कृतीधर्म होता.
जिल्हा लोकल बोर्ड अध्यक्षपदापासून ते मंत्रीपदापर्यंत तसेच पक्ष संघटनेत विविध पदांवर कार्य करीत असताना महाराष्ट्रातील जनजीवनाचा प्रदीर्घ अभ्यास त्यांनी केला होता. त्यातून अविकसित भागांचे प्रश्न, विकासातील असमतोल, दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या भाषणांतून बापूंनी ऐरणीवर आणले. मंत्रिपदाच्या कारकिर्दीत बापूंनी घेतलेल्या निर्णयांचा महाराष्ट्राच्या ध्येयधोरणावर कायमचा ठसा उमटलेला आहे. विधिमंडळाच्या कामकाजातील प्रश्नोत्तराच्या तासात मा. राजारामबापूंनी हजारो प्रश्न उपस्थित करून लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याची संधी विधिमंडळात स्वतः घेतली व शासनास त्यांची भूमिका विशद करण्यास भाग पाडले.
"राजारामबापू पाटील: समग्र चरित्रग्रंथ" मालिकेतील हा दुसरा ग्रंथ सादर होत आहे. लोकनेते राजारामबापूंचे स्फूर्तीदायक जीवन ध्येयवादी निर्मितीची स्फुल्लिंगे मनामनांत फुलवीत राहील आणि नव्या पिढ्यांतून तळमळीचे, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते तयार होत राहतील असा मला विश्वास वाटतो.