Summary of the Book
‘देवनवरी’ नाटकाच्या अर्पणपत्रिकेत या संस्कृतीला ‘बाजारबसवी’ म्हटले आहे; ते सर्वार्थाने खरे आहे. स्वार्थांधांनी कधी अंधश्रद्धेचा तर कधी निव्वळ आर्थिक लोभाचा आधार घेऊन स्त्रियांना बाजारबसव्या केल्या त्याचप्रमाणे ‘संस्कृती’तल्या निर्मळ कल्पनांना बाजारात आणून बसवलं. या देवाधर्माच्या नावाखाली चालणार्या बाजाराचं सर्वात भयानक रूप म्हणजे देवदासी... नाटकातल्या शेवटल्या प्रसंगानं मला रवींद्रनाथ टागोरांच्या ‘विसर्जन’ नाटकातल्या देवीची मूर्ती उचलून गाभार्याबाहेर फेकून देण्याच्या प्रसंगाची आठवण झाली. रक्ताला चटावलेली ती देवी आणि निष्पाप मुलींचं कौमार्य मागणारी यल्लमा यात फरक नाही. त्यामुळं या भीषण नाट्याचा अंत त्या देवी मानलेल्या फत्तराच्या उच्चाटनाशिवाय होऊच शकत नाही.
- पु. ल. देशपांडे ‘संग्रहालय’ एप्रिल 1982
बातमीतील नेमके नाट्य हेरून त्यावर नाटक लिहिणे हे अवघड काम. जागतिक रंगभूमीवर अलीकडे अशी नाटके वेगाने येऊ लागली आहेत. त्या संदर्भात ‘देवनवरी’ हे नाटक महत्त्वपूर्ण वाटते. ‘देवनवरी’ हे खर्या अर्थानं आपल्या मातीतील प्रायोगिक नाटक आहे. कारण हे बंगाल, कर्नाटक किंवा पाश्चात्य रंगभूमीवरुन आयात केलेलं नाटक नाही. म्हणूनच ते आपल्या रंगभूमीचं प्रायोगिक दर्शन घडवते.
- रत्नाकर मतकरी महाराष्ट्र टाइम्स 20-1-1982