Summary of the Book
भारतात अगदी आर्यांच्या काळापासून स्त्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदात महिलांना राजकारणात स्थान असल्याचेही दर्शविले आहे.
उपनिषद, पुराणकाळात ते कायम होते. परकीय आक्रमणानंतरही काही स्त्रिया राजकारणात दिसतात. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात अनेक भारतीय स्त्रियांनी अनेक क्षेत्रात आपल्या कामाने ठसा उमटविला आहे.
यातील राजकारणातील स्त्रियांची चरित्रे व आत्मचरित्रे यांचा अभ्यास करून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन डॉ. मोहिनी कडू यांनी 'भारतीय राजकारणातील स्त्रिया 'मधून केले आहे. प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटीश काळ, स्वातंत्र्यसमर, स्वातंत्रोत्तर काळात स्त्रियांच्या कार्याची दखल घेतली आहे.
यात रझिया सुलतान, राणी पद्मिनी, चांदबीबी, राणी दुर्गावती, झाशीची राणी, बेगम हसरतमहल अशा अनेक राण्यांचे दाखले दिले आहे. स्वातंत्र्यसंग्रामात देशकार्य करणाऱ्या अनेक रणरागिणींची ओळख यातून होते.
विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांची चरित्रे, आत्मचरित्रे, स्वातंत्रोत्तर कालखंडातील स्त्रीचरित्रे, राजकारणातील महिलांची आत्मचरित्रे, अनुवादित चरित्रे - आत्मचरित्रांचा आढावाही यात घेतला आहे.
त्यातून अनेक अज्ञात महिलांचे कार्य उजेडात आले आहे. आपल्या कर्तुत्वाने भारतच नव्हे; तर संपूर्ण जगावर प्रभाव पाडणाऱ्या इंदिरा गांधी यांच्यावरील अकरा चरित्रांचे मूल्यमापन आहे.