Summary of the Book
पडदा उघडतो. प्रकाशमान रंगमंचावर बालनाट्य सुरु होते. नाटकातील पात्रे नाचगाणी, धिंगामस्ती करतात. पोट धरून हसायला लावणारे विनोद घडतात. अद्भुतरम्य वातावरण तयार होते. चेटकीण फिदी फिदी हसते. राक्षस भीती दाखवतो. पऱ्या बागडतात.... असं काही काही या बालनाट्यात घडत नाही. म्हणजे हे नाट्य मुळीच रंजनप्रधान नाही. सामाजिक प्रश्नांना उजागर करणाऱ्या मराठी रंगभूमीचा वसा बालरंगभूमीवर ठोसपणे आणू पाहणारे हे एक प्रबोधनात्मक आणि प्रयोगशील बालनाट्य आहे. नाट्यलेखनात अल्पसंख्य असणाऱ्या स्त्री नाटककाराने म्हणजे सुनंदा गोरे यांनी हे नाट्यलेखन केले आहे, हे विशेष. प्रदूषित नद्यांप्रमाणे जुनाट झालेली मानसिकता बदलण्याचं काम राजू आणि ताई ही मुले करतात. जुन्या पिढीला पटेल असा शंकर आणि भगीरथचा दृष्टांत देऊन जलसाक्षरतेचा विधायक विचार पेरण्याचे सुनंदा गोरे यांचे रचना कौशल्य हे संहितेचे सामर्थ्य आहे. या नाटकातील वडिलधाऱ्यांप्रमाणे नवा विचार स्वीकारायला आपण तयार असू तर 'राजूचे' 'राजेंद्रसिंह' व्हायला वेळ लागणार नाही. बालरंगभूमी रंजनाकडून भंजन आणि निरंजनाकडे नेण्याच्या पायखुणा या बालनाट्यात अनस्यूत आहेत.