Summary of the Book
रेणू पाचपोर यांची मुख्य ओळख आहे ती कवी म्हणून. त्यांच्या संवेदनशील स्वरूपाच्या कविता अनेक रसिक वाचकांना आठवत असतील. पण हा संग्रह मात्र कवितेचा नसून ललितलेखांचा आहे. शिवाय हे सर्व लेख सदररूपाने वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे विषयही तसे साधेसुधे आहेत. पण पाचपोर वृत्तीने कवी असल्याने या लेखांमध्ये कवितेची सळसळ सतत ऐकू येते. सर्वच लेखांना काव्यस्पर्श झालेला आहे. कुठलाही कवी जेव्हा गद्य लिहितो, तेव्हा त्याला कवितेपेक्षा काही वेगळं दिसतं का, ते जाणून घेता येतं का, यापेक्षाही तो आपल्या भोवतालाकडे कसं पाहतो, हेच पाहिलं पाहिजे. पाचपोर यांच्या या संग्रहाकडेही तसं पाहता आलं तर हा संग्रह वाचनीय ठरू शकतो.