Summary of the Book
नव्यानं या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांमध्येही चांगले विद्यार्थी अनेक आहेत.ते सारेच भ्रष्ट प्रवृत्तीला सपशेल शरण जाणारे आहेत असंही नाही.मला असं जाणवतं की नव्या पिढीच्या मनामध्ये वेदना नाही,ठणक नाही,चीड नाही ,संताप नाही असं नाही .गारठून गेलेल्या या क्रांतिकारी आग लावू शकणाऱ्या सरपणाकडं तुमच्या -माझ्यासारख्यांनी जरा आस्थेनं लक्ष देण्यांची गरज आहे.उदासीन होऊन चालणार नाही.आपल्याच्यानं काय होणारंया असं म्हणूनही चालणार नाही.आपल्या मनातल्या अस्वस्थतेला अधिकच्या कृतिशीलतेची जोड द्यावी लागणार आहे.जरा झटावं लागेल. रोगट झडीनं भिजून गेलेल्या मनामनांमधलं नैराश्य हाकलून द्यावं लागेल.त्यात एक नवं चैतन्य ओतावं लागेल.फुंकावा लागेल जरा अधिकचा जाळ.पेटतीलच की बेकारीमुळंभणंगपणे भटकणाऱ्या अन् कुणाच्याही पुढं लोटांगण घेणाऱ्या तरुणाईची मनं.
एकदा का ही मनं पेटली ना ... मग बघा हे सारे कसे सुतासारखे सरळ होतील.या ...या कामासाठी एक खूप मोठी यंत्रणाच उभी करावी लागेल.हे काम काही बैठका घेऊन,निदर्शनं करून ,एखाद दुसरा मोर्चा काढून होणार नाही. एवढ्याशा भपक्यानं कामधेनूच्या कासेला चिपकून मनसोक्तपणे रक्त पिणारे हे गोचीड तुटणार नाहीत,जळणार नाहीत. त्यासाठी सारीकडूनच एक आगडोंब उठवावा लागणार आहे.या साऱ्याचा गोचडांना जाळून भस्मसात करणारा आगडोंब . त्याशिवाय काही खरं नाही.. !