Summary of the Book
अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. मात्र तरीही वैदिक काळात व नंतरही भारतात विविध विषयांवर संशोधन झाले होते. त्याकाळी व त्यानतर भारताने संशोधन क्षेत्रात केलेल्या गौरवशाली प्रगतीची ओळख करून देणारे काही साहित्य जाणीवपूर्वक प्रकाशित होत असते. नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले डॉ. मधुकर आपटे यांचे 'भारतीय वैज्ञानिक' हे पुस्तक अशाच प्रकारातील आहे.
या पुस्तकाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती मोघम व अस्पष्ट नसून थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद आहे. उदाहरणार्थ- 'प्राचीन भारतीय खगोलविद आर्यभट्ट मध्ये आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याबाबत व पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा काळ काढण्याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती देताना नमूद केले आहे की-आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध २४,८३५ मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (२४,९०२मैल) फक्त ०.२ टक्के कमी आहे.
पुस्तकातील सर्वच लिखाण असेच शास्त्र व आधार यांना धरून लिहिलेले आहे. या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट,वैद्यक शास्त्राचे सुश्रुत यांच्याशिवाय चरक, नागार्जुन, अणुसंकल्पनेचे जनक कणाद, गणितज्ज्ञ भास्काराचार्य या प्राचीन काळातील संशोधकांसोबतच आधुनिक काळात विविध क्षेत्रात संशोधक म्हणून मान्यताप्राप्त भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस, सर सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजम, होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर अशा एकूण २५ संशोधकांचे जीवन आणि कार्य याबद्दल सखोल, सविस्तर व सचित्र माहिती आहे.
पुस्तकाची भाषा गोष्ट सांगण्यासारखी सोपी आणि सहज समजणारी आहे. नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी असा विचार गेल्या काही वर्षात जोर धरू लागला आहे. त्यात मुलांना वाढदिवस, मौंज किंवा सत्कार प्रसंगी पुस्तके भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे.