Summary of the Book
अभंग चिंतन हा प.पू.सद्गुरु श्री.श्री.द.(मामा) देशपांडे महाराज, यांच्या संतसाहित्यातील निवडक अशा बारा अभंगावरील रसाळ निरूपणांचा संग्रह आहे. प्रस्तुत ग्रंथात, श्रीज्ञानेश्वर महाराज, श्रीतुकाराम महाराज, श्रीएकनाथ महाराज व श्रीनामदेव महाराजांच्या अभंगांवरील संक्षिप्त अशी विवरणे आहेत. त्यातील प.पू.श्री.मामांनी सांगितलेले काही मौलिक विचार असे:
‘अंध पंगू दृढ जालों’ या अभंगात, ‘वृक्ष एक तेथें होता त्या तळींबैसविलें रीती ।’ असे माउली कोणत्या संदर्भात म्हणत आहेत, ते प.पू.श्री.मामांनी प.पू.सद्गुरु मातु:श्रींच्या उपदेशाद्वारे सांगितले आहे.
प.पू.श्री.मामांच्या आई सांगत असत की, आपणास जे जे ज्ञान अनुभवास यावे असे वाटत असेल, त्यासाठी त्या त्या विशिष्ट वृक्षांचा आश्रय करावा लागतो. कारण मनुष्यशरीर कफ, वात, पित्त यांनी बनलेले आहे. त्यात कफ हा वीस प्रकारचा आहे. पित्त हे त्याच्या दुप्पट म्हणजे चाळीस प्रकारचे आहे आणि वात हा त्याच्या दुप्पट म्हणजे ऐंशी प्रकारचा आहे. यांच्या कमी जास्त मिश्रणाने हा देह बनलेला आहे. या देहातील त्या कफ, वात पित्तांचा दोष-भाग काढून टाकण्याची किमया ज्या वृक्षांत आहे, असे मूळ तीन वृक्ष आहेत; ते म्हणजे वड, पिंपळ आणि औदुंबर.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे त्या त्या वृक्षाखाली बसले, तर तो तो विकार कमी होतो. परंतु वेदाज्ञेप्रमाणे, त्या त्या वृक्षाच्या देवतेचा जप केला, तर त्यापासून झालेले दोष नाहीसे होऊन आत्मज्ञान प्राप्त होते.
प.पू.सद्गुरु श्री.मामांनी ‘बापरखुमादेविवरु’ या माउलींच्या नाममुद्रेचा लावलेला प्रत्ययकारी अर्थ अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. ‘आत्मयाचे घर गुरुखुणे ।’ या अभंगावरील ‘बापरखुमादेविवरु विठ्ठल सखी । कृष्णरूपीं सुखी तनु जाली ॥’ या कडव्यात, माउली लक्ष्यार्थाने सर्व सांगतात असे म्हणून प.पू.श्री.मामा म्हाणतात, ‘बाप’ म्हणजे हे श्रीगुरो ! ‘रखुमा’ म्हणजेच ‘श्रीकुंडलिनी शक्ती’ हिला ‘विवरु’ म्हणजे ‘सुषुम्ना नाडीत’, ‘दे’ याचा अर्थच त्या शक्तीला त्या नाडीद्वारा जाऊ दे; म्हणजेच माझी सखी असलेला तो विठ्ठलही भेटेल आणि कृष्णरूपी तनु सुखी होईल.
‘तेणें केवीं तुटे संसृती’ या अभंगावरील निरूपणात आलेले एक अत्यंत साधे परंतु आशयघन असे उदाहरण म्हणजे ठिणगी आणि स्फुल्लिंग.
शब्दाने ऐकून किंवा वाचून आलेले ज्ञान, हे ठिणग्यांप्रमाणे असते. त्याने काही पारमार्थिक प्राप्ती होणार नाही. परंतु स्फुल्लिंग म्हणजे संतकृपा झाली; तर ‘संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥’ आपल्याच शरीरात असलेली भगवती शक्ती म्हणजे साक्षात स्फुल्लिंग; तो जर संतांच्या कृपेने जागृत झाला, तर वासनारूपी कापूस किंवा कापसाचे वस्त्र जळून जाण्यास वेळ लागणार नाही.
श्रीगुरुकृपा झाल्यावर, नियमित साधना केल्यावर, श्री.नामदेव महाराजांना सर्वत्र विठ्ठलच भरलेला आहे याची प्रचिती आली. तेव्हा अशा अनुभूतीकरिता प्रथम श्रीगुरुकृपा प्राप्त करून घेऊन, नंतर ते सांगतील तसा अभ्यास निष्ठेने व सातत्याने करणे आवष्यक आहे, असे प.पू.श्री.मामा या ग्रंथाच्या शेवटी आवर्जून सांगतात.