Summary of the Book
ब्रिटीश हिंदुस्थान सोडण्यापूर्वी त्याचे भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये विघटन केले. धर्माच्या आधारावर निर्मिती झाल्याने पाकिस्तान जन्मभूमी असणाऱ्या शीख व हिंदूंना नाईलाजास्तव भारतात यावे लागले, तर भारतात पाळेमुळे असणाऱ्या मुस्लिमांनी पाकिस्तानचा आधार शोधला. १९४७ मध्ये फाळणीच्या काळात दंगल पेटली, जो संहार झाला, त्याचे साक्षी असलेल्या ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर व आर्थिक कारणामुळे कुटुंबासह बालवयात भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले असीफ नुरानी यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव कहाणी दोन शहरांची मधून व्यक्त केले आहेत.
नय्यर यांच्या फाळणीविषयीच्या वेदना यातून उमटतात. महात्मा गांधी यांच्या हत्येचे त्यांनी दिल्लीतील उर्दू वर्तमानपत्रासाठी केलेले वार्तांकनही यात आहे. नव्याने पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांच्या समस्यांचे व आता मुजाहीरांचे वर्चस्व असलेल्या कराचीचे वर्णन नुरानी यांच्या कथनात येते. तसेच चित्रपटविषयक नियतकालिकाचे माजी संपादक या नात्याने पाकिस्तानातील बॉलीवूडच्या आकर्षणाबद्दलही सांगतात. फाळणीमुळे दोन धर्मांत निर्माण झालेले द्वेषाचे, भीतीचे, संतापाचे वातावरण निवळून एकात्मिक जग उभे राहण्यासाठी दोन्ही लेखक लेखनातून प्रयत्न करतात. याचा मराठी अनुवाद सायली राजाध्यक्ष यांनी केला आहे.