Summary of the Book
कादंबरीच्या आणि कथेच्या प्रांतात रवींद्र शोभणे हे नाव मराठी वाचकाला आता अनोळखी राहिलेलं नाही.
सद्यःस्थितीतील सामान्य माणसाच्या जीवनातील व्यामिश्रता आणि समाजसापेक्ष जटिलता यांचा निर्मितीच्या पातळीवर शोध घेणं आणि वाचकांना जीवनातल्या मूलभूत प्रश्नांसंबंधी अधिक अस्वस्थ करणं हे रवींद्र शोभणेंच्या लेखनाचं सूत्र म्हणता येईल.
‘वर्तमान’मधील संपूर्ण कथांचा सूर काहीसा असाच आहे. आजच्या या व्यवस्थेत प्रत्येक माणूस जगताना इथल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक व्यवस्थेपासून अलिप्त राहूच शकत नाही. उलट, तो सुद्धा या व्यवस्थाचक्राचा एक भाग म्हणून सतत या आसाभोवती फिरत असतो.
त्याचं हे असं फिरणं म्हणजे आपलं स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवणं; आपल्याच अस्तित्वाचा अधिक खोलात जाऊन शोध घेणं.
हा शोधही अनादी आहे. या शोधप्रक्रियेत दडलेली असते त्याची हार किंवा जीत. किंवा मधला मार्ग म्हणजे जीवनच मुडपून घेणं. जीवन अधिक सुलभ करून पाहणं...‘वर्तमान’मधील कथाही याच शोधप्रक्रियेला सामोर्या जाणार्या आहेत....