Summary of the Book
गणित हा विषय सर्वसामान्य माणसासाठी तसा रूक्ष असतो. पण या शास्त्राच्या आधारानेच अन्य शास्त्रे व कलाविश्वही बहरते. गणित हा एका अर्थी सर्व शास्त्रांचा पायाच आहे. या विेशाचे संचालन अत्यंत काटेकोर पद्धतीने चालते, आकाशस्थ ग्रहगोलांच्या चलन व परिचालनाचे परिणाम मानवी जीवनावर होतात या दृढ विश्वासातून प्राचीन भारतीय गणितज्ज्ञ व ज्योतिर्विदांनी याचे रहस्य उलगडायला प्रारंभ केला. आर्यभट्ट-प्रथम यांच्या पासून सुरू झालेल्या या गणितज्ञांच्या प्रयत्नांना पुढे अनेक भारतीय गणितींनी आपापल्या परीने विकसित केले. याचे फलित म्हणूनच भारतीय गणितशास्त्र सर्व जगापुढे एक प्रगत व परिणत शास्त्र म्हणून प्रकट झाले. अशा ५१ थोर भारतीय गणितज्ञांच्या कार्यकर्तृत्त्वाचा परिचय प्रा. व्यवहारे यांनी या पुस्तकातून घडविला आहे.
आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कर, ब्रह्मगुप्त, लल्लाचार्य, महावीराचार्य, श्रीधराचार्य, माधव, परमेश्वरन असे इसवी सनाच्या
पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत गणित अभ्यासणार्या संशोधकांचा परिचय वाचताना मन थक्क होते. या प्रत्येकाने लिहिलेल्या मूळ संस्कृत ग्रंथांची यादीच लेखकाने दिली आहे.
पंधराव्या शतकाच्या शेवटी जन्माला आलेले केरळी गणिती ज्येष्ठदेव यांच्या पासून आधुनिकाळातील प्रसिद्ध गणिती
श्रीनिवास रामानुजन या कालखंडातील महत्वाचे गणिती म्हणजे स्वामी भारती कृष्णतीर्थ शंकराचार्य हे होत. वैदिक गणिताचे हे
प्रणेते. स्वत: प्रा.व्यवहारे हे वैदिक गणिताचे सखोल अभ्यासक व प्रचारकही आहेत. यामुळे हा लेख जरा विस्तृत आहे. सामान्य
परिस्थितीतून वर आलेला पण आपल्या विलक्षण आणि मेधावी प्रतिभेने जगाचे डोळे दिपवून टाकणारा भास्कराचार्यांनंतरचा
भारतीय गणिती म्हणजे श्रीनिवास रामानुजन्! यांच्यावरील लेखही माहितीपूर्ण आहे.
अठरावे, एकोणीसावे व विसावे शतक वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीसोबतच अवकाश संशोधनाच्या दिशेने पावले टाकणारे
ठरले. त्यात डॉ. सत्येंद्रनाथ बोस, डॉ. राजचंद्र बोस, डॉ. सी.एस.वेंकटरमण, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.नरेंद्र करमरकर, डॉ. प्रभुलाल भटनागर, डॉ. अमलकुमार रॉय चौधरी, राधानाथ सिकदार, डॉ. सर्वदमन चावला, डॉ. हरिश्चंद्र खरे यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच द.रा.काप्रेकर, डॉ.के.ल.दप्तरी, डॉ. हरिश्चंद्र खरे यांचाही वाटा आहे. अशा ५१ दिग्विजयी गणितज्ञांची माहित एकमित्र करणे व ती
परिष्कृत करून सामान्य वाचकांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध करून देणे, हे सोपे काम नाही, कारण हा विषयच वेगळा आहे. प्रा. व्यवहारे यांनी अत्यंत परिश्रमाने ही माहिती संकलित केली. ते स्वत: गणिताचे प्राध्यापक असल्याने या विषयाकडे त्यांनी एका स्वतंत्र
दृष्टिकोनातून पाहिले. देशाच्या उभारणीसाठी याही शास्त्रज्ञांचे योगदान फार महत्वाचे असून त्या प्रयत्नात या गणितज्ञांनी भारताची मान उंचावण्याचा प्रयत्न कसा केला, याचेही दर्शन प्रा.व्यवहारे यांनी घडविले आहे.