Summary of the Book
आपल्याकडे मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या अफाट आहे. असे असूनही बहुसंख्य दर्शनार्थींना मंदिराची रचना कशी असते, त्याची शैली कशी ओळखायची, काळ कसा ठरवायचा, गाभाऱ्यातील देवतामूर्ती खरीच कशी आहे, ती तशी असण्यामागे काही संकेत आहे काय, या संबंधी दर्शनार्थींना काही देणे घेणे नसते. देखल्या देवा भक्तिभावाने नमस्कार केला जातो एवढेच. मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नसून तिच्यात इतिहास, अध्यात्म, वास्तुशास्त्र, शिल्पकला इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव असतो. या सर्वांचा उलगडा करून घेता यावा अशा हेतूने हे लिहिले आहे.
मंदिरे अनेकांच्या आकांक्षांना वाव देत असतात, ती भक्तांना दर्शनासाठी असतात, कलाकारांच्या कलांना वाव देणारी असतात, मग ते कलाकार स्थपती असोत, शिल्पी असोत, मूर्तिकार असोत, नर्तक, गायक-वादक असे कोणीही असोत. मंदिरे उंचच उंच शिखरांची व कलासमृध्द असतील तर आश्चर्य वाटते. ती डोळा भरून पाहावीत, अभ्यासावीत असे वाटते. ती भक्तांना दिलासा देतात, पांथस्थांना सावली देतात, संन्याशांना विसावा देतात, वानप्रस्थींना आसरा देतात, कलाकारांना चेतना देतात, नर्तकांना ऊर्जा देतात, वाट चुकलेल्यांना मार्गावर आणतात, कोणाला रसिकाची दृष्टी देतात, तर कोणाला पौरुष शिकवितात, नास्तिकांना डोळस करतात, तर आस्तिकांना अस्तित्वाची जाणीव करून देतात. मन स्थिर राहण्यासाठी, श्रद्धेला अवकाश प्राप्त होण्यासाठी, अहंकार गळून पडण्यासाठी, अध्यात्मिक 'भूक'भागविण्यासाठी, आजही आपण मंदिरात जातो आणि देवतेपुढे नतमस्तक होत असतो. जीवन समृद्ध, सुखी होण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला मंदिरात जाऊन देवतेपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते ; त्यामुळे आश्वस्त झाल्यासारखे वाटत असते.