Summary of the Book
प्रा सदानंद मोरे यांचे हे पहिलेच नाटक आहे .मराठीमध्ये खूप क्षीण असलेल्या वैचारिक नाटकाच्या परंपरेला एक मोठी शक्ती या नाटकाने दिली आहे .सुमारे पंचवीस एक वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या प्रा. गो. पु. देशपांड्यांच्या ‘ उद्ध्वस्त धर्मशाळा ‘ , ‘अंधारयात्रा ‘ आदी नाटकांनंतर काही एक राजकीय तत्वज्ञान प्रभावीपणे मांडणारे , खर्या अर्थाने वैचारिक म्हणता येईल असे हे नाटक लिहून प्रा मोरे यांनी मराठी रंगभूमिला फार मोठा दिलासा दिला आहे .खंत एवढीच आहे कि हे नाटक पूर्वीच लिहिले गेले असते तर मला त्यात प्रमुख भूमिका करायला मिळाली असती .
- श्रीराम लागू
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भाक्तीयुगापासूनच्या सांस्कृतिक इतिहासाचे एक जाणकार भाष्यकार म्हणून प्रा. सदानंद मोरे यांचे नाव परिचित आहे .’साप्ताहिक सकाळ ‘ मधून प्रसिध्द झालेली ‘तुकाराम दर्शन ‘ आणि सध्या त्याच नियतकालिकामधून चालू असलेली ‘लोकमान्य ते महात्मा ‘ या लेखमाला त्यांच्या सूक्ष्म आणि चिकित्सक व्यासंगाचा प्रत्यय आणून देतात .उत्तम दर्जाची विश्लेषक शक्ती आणि नवनिर्मितीचे सामर्थ्य एकमेकांना छेदणारे नसतात .याचा सुखद प्रत्यय मोरे यांच्या ‘उजळल्या दिशा ‘ या पहिल्याच नाटकाने मिळवून दिला आहे . त्यांच्या वर्तमानकालीन दलित चळवळीच्या विश्लेषणातून एक श्रेष्ठ दर्जाची कलाकृती नाटक म्हणून आपल्यापुढे आलेली आहे .कुठलेही मूल्य , विचार , परंपरा आणि आंदोलन यांचे कालानुरूप स्वरूप व मर्म अंतःसमीक्षेतूनच साकार होऊ शकते .पण ही गोष्ट नाटकासारख्या सर्जनशील प्रभावी माध्यमातून प्रगट करणे सोपे नाही .पण ही गोष्ट प्रा. मोरे यांनी साध्य केली आहे .याबद्दल त्यांचे अभिनंदन .या जिवंत नाटकामुळे परिवर्तनाच्या चळवळीत रस असणारे सर्वच जण अंतर्मुख होतील आणि आंबेडकरप्रणित धम्माचा मार्ग डोळसपणे रुजवण्याचे व्रत अंगिकारतील एवढे सामर्थ्य या नाटकात सामावले आहे .
-प्रा राम बापट