Summary of the Book
'आमच्या वेळेस असे नव्हते', 'हल्लीची मुलेच वेगळी आहेत. ती कोणाचे ऐकतच नाही', अशी वाक्ये घरोघरी एकू येतात. असे म्हणणारी मोठी माणसे खरोखर मुलांना समजावून घेतात का, हा प्रश्न आहे. अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त मुलांना भावनिक आधाराचीही गरज असते, हे अनेकदा विसरले जाते.
मुलांवर अपेक्षा लादून त्या पूर्ण करण्यासाठी आपण त्याला शिकवणी, शिबिरे, क्रीडा प्रशिक्षण आदींच्या मागे पळायला लावतो; पण यात निरागस मुलांचे बालपण होरपळून जात असते, ही बाब लक्षात घेतली जात नाही. यासाठी बालक - पालक सुसंवाद महत्वाचा ठरतो, असे नरेंद्र लांजेवार यांनी 'एकाच नाण्याचा तीन बाजू 'मधून सांगितले आहे. अनाथ मुलांच्या कल्पनेतील आई - बाबा कसे असतात, याचे चित्र यात रंगविले आहे.
स्पर्धेच्या नादात मुलांवर अभ्यासासह अपेक्षांची ओझी लादली जातात. त्यात त्यांचे मुलपण हरवतेच शिवाय अति काळजीमुळे मुले नाजूक बनतात, कुपोषित राहतात. कुमार वयातील मुलांना सतत उपदेशांचे डोस पाज्ण्यापेक्षा त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते जोडल्यास, त्यांच्या अपेक्षा जाणून त्याप्रमाणे वागण्यात बदल केल्यास घर आनंदी राहते, हे यात काही उदाहरणांसह सांगितले आहे.