Summary of the Book
राष्ट्राच्या आर्थिक विकासाची पायाभरणी होते ती अर्थसंकल्पाने. अर्थसंकल्प देशाचा विकास घडवू शकतो तसाच तो रोखूही शकतो. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपावेतो भारतात मांडले गेलेले अर्थसंकल्प अभ्यासणे गरजेचे ठरते. यादृष्टीने मैत्रेय प्रकाशनाचे आगामी पुस्तक 'अर्थसंकल्प: अनेक अर्थ!' हे लक्षवेधी आहे. 1947 ते 2014 या काळात भारतात मांडलेल्या अंतिम आणि अंतरिम मिळून एकूण 80 अर्थसंकल्पांचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात केले आहे. लेखक चन्द्रशेखर टिळक हे गेली 27 वर्ष अर्थक्षेत्रात कार्यरत असून या पुस्तकाद्वारे त्यांनी देशाच्या अर्थकारणाचा व अर्थव्यवस्थेचा सविस्तर, सलग तपशीत्मक व धोरणात्मक विचार मांडला आहे. यामध्ये कोणत्याही सरकारच्या वा अर्थमंत्र्याच्या विरोधात भाष्य नसून ते सर्वार्थाने सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम करणार्या अर्थघटकांचे विश्लेषण आहे. या तटस्थ भूमिकेमुळे पुस्तकाला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. एकूण 21 प्रकरणे असलेल्या या पुस्तकाचे एकूण तीन टप्पे आहेत.
पहिल्या टप्प्यात प्रारंभ करताना लेखकाने अर्थसंकल्प या विषयाची व्यापकता मांडली आहे तर त्यापुढील दोन प्रकरणांत बदलत्या अर्थसंकल्पीय भूमिकांचा मागोवा घेत सिंहावलोकन केले आहे. दुसर्या टप्प्यात 80 च्या दशकातील अर्थसंकल्पांचा धावता आढावा आहे तर त्यापुढील आर्थिक सुधारणांच्या दशकातल्या अर्थसंकल्पांचेही वेगळे विश्लेषण केले आहे. वाजपेयी सरकारच्या तसेच मनमोहन सिंग सरकारच्या अर्थसंकल्पांविषयी या पुस्तकात स्वतंत्र प्रकरणे असून 2004-05 पासून ते 2014-15 पर्यंतच्या 11 अर्थसंकल्पांवर प्रत्येकी स्वतंत्र 11 विश्लेषणात्मक प्रकरणे आहेत. अर्थसंकल्पांच्या विश्लेषणासोबतच विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक अशी परिशिष्टे ही या पुस्तकाची जमेची बाजू. अर्थसंकल्पांची अनुक्रमणिका, देशातील आजवरचे पंतप्रधान, अर्थमंत्री व त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना आणि सेबीचे आजवरचे अध्यक्ष यांची तपशीलवार यादी या परिशिष्टांत समाविष्ट आहे. त्यामुळे सामान्य वाचकांसोबतच अर्थशास्त्र, अर्थसंकल्पाचे अभ्यासक व तज्ज्ञांसाठीही हे एक संग्राह्य पुस्तक ठरेल हे निश्चित.