Summary of the Book
' आपण नुसते हामाल हे. हामालावून बी निफ्तर! कशे म्हना. जमिनी लय हाये आपल्याजो, पण नुसत्या नावाले. खरे मालक दुसरेस हे तिचे. शेठ, सावकार, बँका, पतपेढ्या, राजकीय नेते हे मालक हे तिचे. त्येंच्ह्या तालावर नाचतो आपू. ते, नाचवता आन् रंघत शोषून घेता आपलं. कसा वाचीन शेतकरी मंग?' दगा मास्तरानं सांगितलेलं खानदेशी 'तावडी' भाषेतलं हे -हाससूत्र 'कुंधा' या अशोक कौतिक कोळी यांच्या या कादंबरीचा अर्थबिंदू आहे.
गावरहाटीतली सनातन संघर्षघंटा कादंबरीतून लेखकाने अशी काही वाजवली की, राजकारणाचा कुंधा वावर आणि शेतच उखडून फेकायला कसा सज्ज झाला; यासंबंधीचा थरार उभा करण्यात ही कादंबरी पुष्कळ विजयी झाली आहे. लेखकाकडे मोठे भाषादव्य आहे, अनुभव सोलून मांडण्याची ऊर्जा त्याच्याकडे आढळून येते. शिवाय गावातील हितसंबंध सडवत ठेवणारी काळोखजन्य वृत्ती सूड, लोभ, बदला, वचपा आणि तंटा यांना एकत्र मिसळून सतत वर कसा नागफणा काढते, याचे भेदक चित्रण 'कुंधा' कादंबरीतून आलेले आहे. कुंधा प्रतीकरूपाने सिद्ध झाला असला तरी शेतीच्या कर्माधर्माशीच तो जखडलेला नाही.
गावातील झगड्याच्या मूळाशी हा कुंध्याचा राक्षस आहे. राजकारणानिमित्त बखेडा उत्पन्न करणारा कुंधा तर कादंबरीत खलनायकासारखा वधिर्त झालेला आहे. कादंबरी वतनदार वाडा आणि आसामी वाडा या दोन संघर्षपीठांचा पीळ प्रगट करते. ही दोन्ही संघर्षपीठं क्षीण मतलबांसाठी जीवांवर उठतात. आणि एका अर्थानं दोघंही रक्तबंबाळ होतात.