Summary of the Book
नागपूरचे अमृतरावं दिघे हे स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे संयुक्त कुटुंब सुखाने नांदत असत. मुलगा वसंता राणीच्या प्रेमात पडतो. कविता, साहित्यात रमणारी राणी व वसंता अचानक विवाहबंधनात अडकतात आणि दिघ्यांच्या कुटुंबात नाट्यमयता येते. अवखळ राणीचे मन संसारात लागेनासे होते.
लग्नापूर्वी वसंताशी पात्रातील काव्यातून बोलताना वाटणारी असोशी तिला प्रत्यक्षात नकोशी होते. पहिला मुलगा रवीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर ती अगदीच एकलकोंडी होते. सुधाकर हा तिच्या जीवनात येतो आणि ती पुन्हा खुलायला लागते. मुंबईत बि-हाड केल्यानंतर राणी - वसंताला दोन मुले होतात. मात्र सुधाकर व तिचे संबंध कळल्यावर वसंता तिला जाब विचारतो. राणी खरे सांगते आणि मुलांना घेऊन माहेरी इंदूरला जाते. तेथे वडिलांवर भार न राहता नोकरी करते.
दिघे कुटुंबियांचे राणीला परत बोलविण्याचे प्रयत्न व्यर्थ जातात. अखेर मुलांना घेऊन वसंता एकटाच परत फिरतो. विश्राम गुप्ते यांची 'चेटूक' ही कहाणी गुंतवून ठेवते, अंतर्मुख करते. बंडखोर राणीचे विश्व उभे करताना १९५० - ५२ चा काल, त्या वेळचे समाज, कुटुंब व्यवस्थेचे वर्णन येते. पती पत्नीचे नाते, प्रेमाच्या छटा यात व्यक्त होतात.