Summary of the Book
प. प . सद्गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची ही श्रीमत् दासबोध , एकनाथी भागवत व इतर ग्रंथावरील निरुपणे आहेत . या १३ निरुपणातून आपल्याला साधना कशी करावी ? आपल्या आतील जाणीव ही सर्व व्यापक कशी आहे ? हे समजते .
या पुस्तकात अध्यात्म ज्ञानाच्या वेगळ्याच व्याख्या श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी केलेल्या आढळतील . उदा. स्वाध्याय म्हणजे स्वरुपाकार वृत्तीत राहणे . पुस्तकांचा अभ्यास करून ज्ञान बोलणे म्हणजे स्वाध्याय नव्हे . षड्गुणांचा देखिल येथे वेगळा अर्थ पाहण्यात येतो . वैराग्य म्हणजे कशाचीही इच्छा न करणे . तसेच औदार्य म्हणजे असलेले देणे व असलेले पण सांभाळावेसे न वाटणे होय .
साधन कशी करावी तर सकाळ - संध्याकाळ शांत मनाने ध्यान करावे . श्वास कोंडणे वगैरे प्रकार करू नयेत . घरात माणूस मृत झाले असले तरी ध्यान सोडू नये . दुसऱ्या दिवशी सवड नसेल तर उद्याचे ध्यान आज जास्त करावे पण ध्यान सोडू नये . असे श्री सिद्धरामेश्वर महाराज येथे सांगतात .
ब्रम्ह आणि परब्रम्ह यांच्यातील फरक आपल्याला येथे नीट अभ्यासता येईल . जोपर्यंत कशाचा तरी अनुभव आहे तोपर्यंत ते ब्रम्ह आहे . परब्रम्हामध्ये कशाचाही अनुभव नाही . पर हा शब्द ब्रम्ह या श्ब्दाअगोदर जोडला आहे म्हणजे ब्रम्हा अगोदर जे काही आहे तेच परब्रम्ह होय . ब्रम्हच अंतिम असते तर परब्रम्ह हा शब्दच योजला नसता . ब्रम्हापलीकडे , ब्रम्हाअगोदर जे आहे ते परब्रम्ह होय .
या निरुपणांच्या मध्ये मध्ये गोलाकार कंसातील मजकूर हा श्रीनिसर्गदत्त महाराजांनी साधकांच्या स्पष्टीकरणार्थ दिलेला आहे . हे पुस्तक साधक भक्तांना जाणीवेत राहून जाणीवे पलीकडे जाण्यास नक्कीच मदत करेल .