Summary of the Book
जीवनानुभवाचं सच्चेपण मांडणारी छायाची कविता ही वेदनेचा हुंकार आहे. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेताना होणारी तडफड, असाह्यता या कवितेतून अधोरेखित होत असली तरी कुठलाही आक्रस्तळेपणा तिच्यात नाही. त्यामुळे कवितेतलं सत्व हरवलेलं नाही. जीवनातल्या उणीवांसह जाणीवेचं रसरशीतपण टिकून असल्यानं ही कविता जशी दाहक आहे तशीच मोहकही आहे. बदलत्या काळाचे हे पडसाद अपरिहार्य आहेत. कवितेत आधुनिक प्रतिमेचं नेटकं रूप, प्रवाही जीवनशैलीचं नेमकं वर्णन आहे. मात्र केवळ आधुनिकतेच्या हव्यासाची बाधा या कवितेला नाही. वास्तवाच्या जवळ नेणारी, मनाचा ठाव घेणारी छायाची कविता अस्वस्थ करणारी आहे. जे जे जगले, भोगले त्याला शब्दरूप आले, अशी छायाची कविता रसिकांना नक्कीच आवडेल. तिच्या काव्य प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा !
- अस्मिता गुरव