Summary of the Book
महाराष्ट्रातून गेल्या काही दशकांत महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतात आणि भारताबाहेरच्या देशांत मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाली. महाराष्ट्रातही गेल्या काही दशकांत गुजरात, बिहार, आंध्र, कर्नाटक आणि इतर प्रांतांमधली माणसं अनेक कारणांनी आली व इथेच राहिली. या स्थलांतराचे वेगवेगळे परिणाम मराठी भाषेवर तर झालेच, पण मराठी समाज व संस्कृतीवरही झाले.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जागतिक सत्तेची मांडणी आर्थिक वर्चस्वानुसार होत गेल्याने एकूणच, माणसाच्या जगभर होत चाललेल्या जीवनपरिवर्तनाला नवी दिशा मिळाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं या परिवर्तनात फार मोठी भूमिका बजावली आहे.
अशा वेळी एखाद्या लोकसमूहाची पूर्वप्रतिष्ठित, पूर्वपरिचित अशी त्याच्या ओळखीची, त्याच्या अस्मितेची चिन्हं बदलणं किंवा पुसली जाणं हे स्वाभाविक आहे आणि काही काळ त्यामुळे त्या लोकसमूहानं संभ्रमित होणंही सहज आहे. मराठी समाज सध्या अशाच संभ्रमित अवस्थेतून जात आहे. या संभ्रमामागे स्थलांतर आणि जागतिकीकरण या दोहोंच्या परिणामांची गुंतागुंत आहे. अशा स्थितीत विस्तारलेलं मराठीपण समजून घेण्याचा हा खटाटोप.