Summary of the Book
संजय बोरुडे यांनी लिहिलेला पर्णसूक्त हा कदाचित मराठी साहित्यविश्वातील एक आगळावेगळा काव्यसंग्रह असेल. पान हा एकच विषय घेऊन त्यांनी लिहिलेल्या जवळपास ५७ कविता यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. झाडाच्या पानांना समजून घेत घेत त्यांची कविता पुढे जाते. पानांबाबतचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या कवितेतून व्यक्त झाले आहे. संजय बोरुडे यांचा बॉटनी हा आवडता विषय. साहजिकच फुला-पानांमध्ये रमणारा स्वभाव असल्याने आणि काव्यलेखनाची थोडी बैठक असल्याने त्यांनी पान या एकाच विषयावर पाच कविता लिहिल्या. त्या कवितांना मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी मनात असणारी पर्णसूक्ते कागदावर उतरविली. त्यातूनच या कवितांची निर्मिती झाली. कवितेत पानांवर असल्या तरी त्या प्रत्यक्षात अनेक विषयांचे सूचन करतात. पानांचे स्वतंत्र जगणे असते आणि माणसाच्या भवतालाची सांगड या कवितेत घालण्यात आली आहे. अर्थात, ही सांगड घालताना कवीने पानांचे इतके बारकावे टिपले आहेत, की ही कविता एकाच वेळी पानांचीही वाटते आणि नाहीही! हेच या कवितेचे यश म्हणावे लागेल. एकेका ओळीत एकेक शब्द अशा पद्धतीच्या मांडणीमुळे रचनेतही अधिक सुटसुटीतपणा आलेला आहे.