Aaba Govinda Mahajan
24/04/2019
सोपं लिहणं कठीण असतं. मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणं त्याहून अतिकठीण. मुलांचे भावविश्व, त्यांचे मानसशास्त्र अचूक हेरुन दर्जेदार लिहणं ही आजच्या काळाची गरज आहे. नेमकी हिच गोष्ट कवी संजय वाघ यांना नेमकेपणानं जमलीय. नुकताच त्यांचा ‘गाव मामाचं हरवलं’ हा बालकिशोर कवितासंग्रह वाचनात आला. सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वङो यांची चित्रशैली महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आशयाला अनुसरुन त्यांची चित्रं कवितांना बोलकी करतात. त्यामुळे हे बहुरंगी पुस्तक मुलांना सहजरित्या आकर्षित करतं. या पुस्तकात एकूण 23 कविता आहेत. कवितांचा आशय आणि विषय यामुळे हे पुस्तक मनात घर करून जाते. या पुस्तकाला डॉ. विजया वाड यांची प्रस्तावना तर किरण केंद्रे यांनी पाठराखण केली आहे. पुस्तकाची प्रस्तावना व ब्लर्ब यावरुन पुस्तकाची गुणवत्ता निदर्शनास येते. या संग्रहात खारुताई, मोर, ससा, चिमणा, कावळा या पशुप्राण्यांचे जसे जग यात समाविष्ट आहे, तसे झाडबाबा, ढगदादा, चांदोबा असे निसर्ग, पर्यावरणाच्या कविताही वाचकांचे लक्ष वेधून घेतात. ‘एक तरी गजरा घ्या’, ‘ हे डोंबा-याच्या मुली’, ‘माय सोन्याचा कळस’ यासह ‘स्वप्नात आली परी’ ही कवितासुद्धा गुंतवून ठेवते.