Summary of the Book
महाराष्ट्राचा व मराठीचा ज्ञात इतिहास हा एक हजार वर्षाहून अधिक काळाचा आहे. तो ऊर्जस्वल तसाच दैदिप्यमान आहे. पण हा इतिहास ग्रंथ, हस्तलिखिते, पत्रव्यवहार, फर्माने, वंशावळी, काव्ये, कथा, दंतकथा, शिलालेख, मंदिरांच्या, मशिदींच्या, किल्ल्यांच्या, दर्ग्याच्या रूपात विखुरलेला आहे. त्या सर्वांचा शोध घेऊन सलग, संपूर्ण एकात्म स्वरूपात इतिहास सिद्ध करणे हे येरागबाळाचे काम नव्हे. इतिहासाचार्य राजवाडे, गो. स. सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे प्रभुतींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण न क्षण त्यासाठी व्यतीत केला. भारतीय अस्मितेची तेजस्वी शलाका म्हणजे मराठी भाषा व संस्कृती. ती विझवण्यासाठी दिल्लीश्वरांनी बाराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत निकराने केलेल्या प्रयत्नांना झालेला प्रखर प्रतिकार म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास.
अतएव त्यातील प्रत्येक घटना, प्रसंग, व्यक्ती, घर व घराणे यांना आपोआपच अखिल भारतीय स्वरूप प्राप्त होते. ही अखिल भारतीय भावना म्हणजे शिवप्रभुंची हिंदवी स्वराज्याची कल्पना. हे श्रीचे राज्य व्हावे म्हणून त्यांनी सतराव्या शतकात आपल्या जीविताचा होम केला होता. त्या आदर्शाचा शोध व बोध घेण्यासाठी हैदराबादच्या श्री. सेतुमाधवराव पगडी यांनी ६० वर्ष अहोरात्र अचाट उदयॊग केला. अखंड सावधानतेबरोबर सतत लेखन, संशोधन, अभ्यास व संचार या चतू:सूत्रीच्या आधारावर हैदराबादच्या मुलस्थानापासून मध्य आशियापर्यंत त्यांच्या प्रज्ञेने त्या आदर्शाच्या अंगोपांगांचे सूक्ष्म व सर्वगामी निरीक्षण व परीक्षण केले. त्या सर्वांचे फलित म्हणजे आयुषयात त्यांनी ६६ मराठी - इंग्रजी ग्रंथांची रचना केली त्यातून उलघडणारा इतिहासाचा पट त्यांनी आजच्या वर्तमानाची व भावी पिढ्यांसाठी ठेवलेला वारसा म्हणजेच हा समग्र सेतुमाधवराव पगडी ग्रंथ प्रकल्प.