Summary of the Book
आ. बाबा आमटे यांच्या कुळाशी इमान राखणाऱ्या डॉ. राजेंद्र मलोसेंचे वैचारिक अधिष्ठान स्पष्ट आहे.
भोवतालचे डॉक्टर मित्र भौतिक मृगजळामागे पळत असताना आणि 'आहे रे'ची सर्व योग्यता असताना जाणीवपूर्वक 'नाही रें'ना आपलंस करू पाहणारे मलोसे, एक दुर्मिळ उदाहरण आहेत. जणू कोळशाच्या खाणीत आढळलेला पैलू पडण्यापूर्वीचा हिरा!
गगनाला गवसणी घालणारा पुस्तकी आदर्शवाद आणि खडबडीत व्यवहारी जमिनीवरील प्रत्यक्ष जीवन यामधल्या खाईत लंबाकाप्रमाणे दोलायमान होणारे संवेदनशील मन, मालोसेंच्या कथाविश्वाला आकार देते.
समाजाचा एका वेगळ्या दृष्टीकोनातून विनासायास आरपार वेध घ्यायला मिळत असल्याने लेखकाजवळ अनुभवाचा चांगला साठा आहे. अंधश्रद्धेवरच अपार श्रद्धा असणारा समाज आणि त्याला त्याच खातेऱ्यात कायम राखू पाहणारी स्वार्थी व्यवस्था, ज्यामध्ये 'बाहेर'ज्यांचा चंचूप्रवेशही शक्य नसतो, असे हे जग आहे.
डॉक्टरची बॅग आपण धरायची असते हे गावीही नसलेले, डॉक्टर घरी आल्यावर त्यांना बसवण्यासाठी निदान सतरंजी टाकावी हेही न समजणारे, याच्याही पलीकडे कडाक्यात थंडीत शेकोटीभोवती स्वतःला शेकत असताना, आपणच घरी बोलावलेल्या आणि नाईलाजाने अनाहुतासारखा जरा बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टरला आपल्यात सामावून घेण्याचे सौज्यनही नसलेले लोक आपल्याला इथे दिसतात.
असे असूनही जराही आवाज न वाढवता, शांतपणे, थोडक्यात नेमकेपणाने बोलणारी 'डॉक्टरी' हातोटी लेखनातही निगर्वी मलोसेंना लाभली आहे. कसलाही अविर्भाव न आणता, तपशिलांचा पसारा टाळत, कुठेही न रेंगाळता वाहत जाणारी, प्रवाही अनलंकृत भाषा, हे लेखनाचे वैशिष्ट्य आहे. सयंत स्वरात थेटपणे भिडणाऱ्या कथेत दुर्लभ तटस्थता आहे. प्रांजळ निवेदनातून आपसूकच लेखनात येणारे अपरिहार्य अकृत्रिम कथनशैलीचे 'प्रयोग' सुद्धा दिसतात. काहीशा कोमट वाटणाऱ्या निवेदनाला क्वचित नर्मविनोदाची झालरही दिसते.
आयुष्याच्या जुगारात ज्या जीगारबाजीने मालोसेंनी स्वतःला पणाला लावले आहे., त्याच इर्षेने त्यांनी त्यंच्या लेखणीला जर धार लाव्वली, तर जीवनाचा दाहक दंश देणाऱ्या जळजळीत वास्तवाच्या कसदार कथा मलोसेंना अशक्य नाहीत. तेवढे संचित त्यांच्याजवळ आहेच.