Summary of the Book
श्री. उत्तम बंडू तुपे यांच्या सर्वच कादंबर्यांतून स्वत:ची अशी वास्तवता व्यक्त झालेली आहे. या विश्वात ग्रामीण भाग आहे, त्यातली जीवापाड कष्ट करणारी माणसे आहेत, त्यांचे अभावांनी ग्रासलेले जगणे आहे. ग्रामीण जीवनातली स्थित्यंतरे आहेत, तसेच मानवी मनातील विचार विकारांचे आवेगही आहेत. तुपे यांच्या कादंबर्यांतून ग्रामीण अठरापगड समाज आणि व्यक्ती यांच्यातील संघर्षाला मध्यवर्ती स्थान आहे. या जीवनातला मुख्य प्रश्न पोटाच्या भुकेचा असला तरी तेवढ्यापुरता तो मर्यादित राहत नाही. कारण सबंध आयुष्य हे पोटाची भूक भागविण्यासाठी कराव्या लागणार्या ज्या कष्टात जाते, त्याचे मानवी मन, देह, व्यक्तीव्यक्तींचे परस्परसंबंध यांवर होणारे परिणाम यांचे चित्रण त्यांच्या कादंबर्यांतून येते. माणसाच्या भोगवट्याला अज्ञात आणि अदृश्य अशी काही कारणे आहेत, असेही ते कादंबरीतून मांडतात.
प्रस्तुतची ‘कळा’ ही कादंबरी मानवी जीवनातील दुबळेपणा आणि भोवतालची सामाजिक परिस्थिती यांचे वास्तव प्रकटीकरण करणारी अस्सल ग्रामीण कांदबरी आहे.