Summary of the Book
भूमिनिष्ठांची मांदियाळी। इंद्रजित भालेरावचा नवा कवितासंग्रह। चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत तुकाराम, म गांधी, टागोर, कवी पाश, साधना आमटे, बराक ओबामा, पोपटराव पवार अशा एकूण सोळा व्यक्तिरेखा दीर्घ कवितांमधून या संग्रहात चितारल्या आहेत. भूमिनिष्ठा हा मूळ पिंड कवीचा. सखोल अभ्यास, आकलनाची आस, संयमी सातत्य आणि शब्दकाव्यात कायम तुडुंब असलेलं झपाटलेपण इंद्रजितला सतत पुस्तकपानांभोवती बांधून ठेवतं. एकेक व्यक्तिरेखा शब्दांत साकारताना आधीचे बरेच दिवस त्याला अस्वस्थ आणि अशांत ठेवत असतात. बारीकसारीक गोष्टींपासून समग्र माहिती त्याच्या चिंतनाच्या अग्रभागी असते. त्याच्या ओघवत्या शैलीतून दीर्घकविता आकार घेते. यातील काही कविता थेट व्यक्तीशी संवाद साधताना दिसतात. कबीर इथे दिसतो, उद्या तिथे, अजून कुठे, कष्टकऱ्यांच्या वस्तीत, कपाटातील पुस्तकात, शेतातल्या देवळात, गावातल्या वेशीवर, त्या त्या वेळी कवितेतून त्याच्याशी संवाद साधल्या जातो. 'अरे कबीरा, परवा तुला नेटवर पाहिलं..' अशी कवितेत आत्मीय नातं असल्याची शैली उतरली आहे. कौतुकानं जरा दूरवरून त्यांचं एकमेकां व्यक्त होणं रसिक अनुभवत राहतो. कवितेचा उत्कट शेवट बघा,
'देवाशिवाय धर्म धर्माशिवाय अध्यात्म
म्हणजे तुझी कविता
अध्यात्माने ओली केल्याशिवाय जमीन
कसे अंकुरतील कोंब कवितेचे
शेवटी कविता हेही अध्यात्मच असतं ना
म्हणून फकिरीतच रमतात खरे कवी!'
कवी पाशवर लिहिलेली दीर्घ कविता कवीचे मन पाशविषयी किती सजग, संवेदनशील झाले आहे हे कळते. अत्यंत हळूवारपणे पाशच्या अवघ्या जीवनाशयाला बिलगलेली ही कविता आहे. तादात्म पावणे, एखाद्या गोष्टीत समरस होणे काय असते ते कवी पाशविषयीची कविता वाचताना इंद्रजित किती विभोर होऊन त्याच्यात उतरला आहे हे लक्षात येते.