Summary of the Book
सौ.माधुरी बागडे-अलई यांचा 'अंतरीचा मधुरिमा'हा संग्रह वाचताना त्यातील विचार-प्रवणता ठायी ठायी जाणवली आणि तरीही त्यातून कविता उगमाच्या खुणा जागोजागी सापडल्या !अर्थात ह्याचे श्रेय माधुरी यांच्या वैचारिक सुसूत्रतेला जाते.विचाराचा व्यूह, मनाचे वाटणे वा एखादा हलकासा विचारही,त्या त्यांच्या ठाम लयीत अशा गुंफतात की त्याची सहज कविता होते.
आमच्या फ.मु.शिंदे सरांची एक गंमतीशीर ओळआहे की 'काही जण लयीत लिहितात नि काही नुसतेच वहीत लिहितात !' यातील गंमतीचा भाग सोडला तर ,लयीत लिहिण्याची वा विचार करण्याची कला अंगी असल्याशिवाय कवितेसारखा पद्य साहित्यप्रकार उद्भवणे शक्य नसते.
कवीचा ओळखच 'लय ' असल्याने अशी एक लय सापडल्याशिवाय कवीपण मिळवणे शक्य नसते.माधुरी यांचे शिक्षकी पेशातील मनस्वीपण आणि साहित्याप्रती असलेली त्यांची आवड त्यांना ही 'ली ' सहज देऊ गेली असावी. कवितेचा हा मूळ आणि महत्त्वाचा गाभाच माधुरी यांच्या हाती आल्याने त्यांना कविता सहजी गवसल्या .
'अंतरीचा मधुरिमा ' ह्या संग्रहात कवयित्री माधुरी मधील भावोत्कटता अनेक ठिकाणी आपण अनुभवली आहे. वैचारिकतेतून,काव्यात्मकतेकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या माधुरीला कवितेच्या नव्या वाटचालीस खूप खूपशुभेच्छा !