Summary of the Book
हे एका सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याचे आत्मकथन आहे. प्रशासनात काम करणारे लोक प्रशासनातून बाहेर पडले की त्याविषयी प्रचंड निराशेने बोलत असतात. निदान सध्या तरी तशी 'फॅशन' आहे. या आत्मचरित्रात मात्र अशा निराशावादाला थारा नाही. उलट, ते आशावादाने आणि काहीसे आदर्शवादाने भरलेले आहे.
१९४७ साली लेखक एसएससी बोर्डात अधीक्षक झाले आणि ६७ साली ते बालभारती पाठय़पुस्तक मंडळाचे सचिव झाले व तेथूनच ८७ साली निवृत्त झाले. बालभारतीचे ते संस्थापक सचिव. त्यामुळे बालभारतीची निर्मिती, तिच्या कामाचे सुरुवातीचे स्वरूप, पहिले संचालक, सरकारी फायलींची चालढकल, कोर्टकचेऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी त्यांनी लिहिले आहे. बालभारतीचा हा सुरुवातीचा इतिहास माहितीपूर्ण आहे. त्यामुळे साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्राचा आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. निवृत्तीनंतरही लेखकाने २५ वर्षे पुण्यातील दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये मुख्य प्रशासक म्हणून काम केले. या कामाचाही त्यांनी आढावा घेतला आहे. एक उत्तम, कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून काम केलेल्या शंकर थत्ते यांचे हे आत्मचरित्र वाचनीय आहे.