Summary of the Book
रामायण हे भारतीयांसाठी पवित्र व आदर्श आहे. एकवचनी, एकपत्नीव्रत धारण केलेला पराक्रमी, धैर्यवानम आज्ञाधारक रामाबद्दल सर्वांना प्रेम आहे. म्हणूनच ग. दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी संगीत दिलेले गीतरामायण आकाशवाणीवरून प्रक्षेपित होऊ लागले तेव्हा त्याला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रामायणातील राजा दशरथ, जनक, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण यांच्या व्यक्तिरेखा व घडलेले प्रसंग यामागील गूढ भावार्थ मन, शरीर, निसर्ग यांतील रुपकं जोडून श्री बालाजी तांबे यांनी श्रीराम विश्वपंचायतन - उकल गीतरामायणाची' मधून उलगडला आहे.
गीतरामायणातील मूळ काव्य व सोबत त्याची उकल यात त्यांनी केली आहे. राम म्हणजे जाणीव, आत्मा, सीता म्हणजे शरीर, लक्ष्मण म्हणजे विवेक, हनुमान म्हणजे प्राण, शूर्पणखा म्हणजे वासना, रावण म्हणजे अहंकार, शबरी म्हणजे ज्ञान अशा अनेक स्वभावांनी सिद्ध झालेल्या रामायणाचा वेगळा अर्थ यातून समजतो. एक वेगळी जाणीव यामुळे निर्माण होते. या रामनामाच्या जोडीला औंधचे राजे श्रीमंत बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांनी सुमारे ९५ वर्षांपूर्वी चितारलेली रामायणातील प्रसंगांवरील दुर्मिळ चित्रे पाहण्याची संधी यातून मिळाली आहे.