Summary of the Book
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक आणि धाम्माविचारांची नवनव्या पिढ्यांनी आपल्या अस्तित्वाची आणि अस्मितेची ओळख समाजव्यवस्थेला करून दिली. पुस्तक हाती पडलं आणि सारा अन्याय, अत्याचाराचा इतिहास बदलविण्याची धमक पिढ्यांमध्ये आली अशा जाणिवा प्रगल्भ असणाऱ्या पिढीतलं नाव राजेंद्र पारे आहे. जीवनात वास्तवतेचा अनुभव घेत आपल्या लेखणीतून व्यक्त होणाऱ्या ह्या कवीनं गरिबीचं अवडंबर न माजविता त्यावर मात करीत स्वतःला घडवत समजाव्यवस्थेला आपली कविता, विचार देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. 'ठिगळ अन टाके' हे कवितासंग्रहाचं शीर्षक सूचक आणि भोगलेल्या पिढ्यांचं दु:ख आहे.
काही जीवांसाठी
जीव ओतणारी जमात
आणि
काही जीवावर
जीव घेणारी गिधाडे जमात
हा संघर्ष पिढीजात सुरूच आहे. ह्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण माणसांच्या ह्या बाजारात कवीला हा संघर्ष थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत. चळवळीचा इतिहास साऱ्यांना माहिती आहे. चळवळीची दशा आणि दिशादेखील ज्ञात आहे. पण चळवळीशी प्रामाणिक असणाऱ्या ह्या कवीनं आपला बाप कार्यकर्त्यांनं विसरू नये किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान आपल्या साऱ्यांच्याच जीवनात किती महत्वपूर्ण आहे हे मांडताना कवी म्हणतात,
तो किंचित हसत
जणू धुत्कारतच म्हणाला...
अडाणी माणूस मी
प्राणास त्यागेन पण...
बापालाच 'बाप' म्हणेन मी
नव्या पिढीला आपल्या अनेक पिढ्यांची बापाची ओळख करून देणारे कवी राजेंद्र पारे यांची साहित्यिक वाटचाल नव्या उमेदीची, नव्या संघर्षाची आणि नवविचारांची देखील आहे. आपल्या आईच्या कष्टाची जाणीव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक विचार अंगीकारत अध्यापन करताना नव्या पिढीच्या जीवनात शिक्षणाची सूर्यपहाट आणण्याचा त्यांचा प्रयत्न सर्वश्रुत आहेच. बुद्धांचा विज्ञानवादी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस घडविण्याचा विचार कवी वास्तवतेचं भान जपत कवितासंग्रहातून मांडतात. त्यांच्या शब्दांचं स्वागत! मन:पूर्वक शुभेच्छा!