Summary of the Book
बालपणं जसं रम्य असते तसं ते नटखट असते. बालपणीच्या सुखाच्या आठवणी चिरंतन ठेवा असतात. आई-बाबांचे संस्कार, नात्या-गोत्याचा जिव्हाळा, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाची प्रयोगशाळाच असते हे बालपण ! नदीकाठचे खेळणे, झाडा-फुलांशी मैत्री, निसर्गातले मस्त हिंदळणे, तळ्या-मळ्यात समरसणे, मित्रमैत्रिणींची आंगतपंगत, मोराचा पिसारा, सुगरणीचा खोपा, बैलगाडीतील सफर, मामाच्या गावच्या आठवणी. हे सारं काही बालविश्वाचं फुलणं असते. भावविश्वातलं रमण असते. संस्कारांच्या खुल्या शाळेतलं भावसाक्षर होणं असते. जिज्ञासा, उर्मी आणि निर्मितीचा आनंद घेण्याची हि प्रयोगशाळा असते. बालपणीच्या भावविश्वातून कल्पना विश्वात रमायचं. कल्पविश्वातून विज्ञानमय सत्य विश्वात वाटचाल करायची. हि वाटचाल म्हणजेच बालपणीचं फुलणं असते.
साने गुरुजी म्हणजे मुलात मूल आणि फुलात फुल होते. " करी मनोरंजन जो जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे" अशी त्यांची धारणा होती. फुलांच्या रंगात रंगायचं, सुगंधानं गंधित व्हायचं, त्यांच्या नाजूक, निरागस कोमलतेनं संवेदनशील जगायचं. हा बाळ विश्वातल्या भावनांचा 'फुल-फुलोरा' असतो. आनंदी, स्वच्छंदी वातावरणात फुलणारा हा निसर्गाचा ठेवा असतो. निसर्ग-पर्यावरणात रमणारा बालपणाचा आनंदोत्सव असतो. त्याच्या संस्कारशील जडणघडणीतून बालविश्वाची असंख्य ताटवी ताजी टवटवीत होतात. कळ्यांची फुलं होतात. फुलांचा फुलोरा होतो. सुंदर-सुगंधी घोस फुलतात. नटखट बालपणाचे हे सुंदर, निरामय, नितळ प्रतिबिंब काव्यफुलांतून उमटते. असा हा 'फुल-फुलोरा' बालविश्वाला अर्पण करतो.