Summary of the Book
मध्ययुगीन मराठी संतकवी आणि पंडित कवी यांच्या शृंगारिक काव्याचे व कथाकाव्यांचे चिकित्सक रसदर्शन घडविणारे ‘शृंगाररस आनंदयात्रा’ हे प्रा. डॉ. शरद घाटे यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकातील एकूण प्रतिपादनाची आधार चौकट जुन्या काळातील (पितृप्रधान व्यवस्थेतील) स्त्री-पुरुषाच्या आकांक्षांची आहे. असे असूनही आजच्या काळातील स्त्री स्वतंत्रपणे कर्तृत्ववान असू शकते, याची नोंद त्यांनी केली आहे. मात्र, या पुस्तकाची चौकट पितृप्रधान समाजव्यवस्थेत वाढलेल्या स्त्री-पुरुषांच्या परस्परआकांक्षांची आहे. ‘पती-पत्नीचे, प्रियकर-प्रेयसीचे एकमेकांवर जर निरतिशय प्रेम असेल तर दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांचा विकास होतो,’ हे सूत्र त्यांच्या विश्लेषण-विवेचनात महत्त्वाचे ठरते.
स्त्रीवाद, स्त्री-पुरुष समता असा काही चष्मा या लेखनामागे नसतानाही केवळ ऐहिकतेच्या चष्म्यातूनही रामायण-महाभारत काळातील शृंगारस्वरूपाचे विवेचन करताना किंवा महानुभाव पंथातील स्त्रीविषयक भूमिकेचा विचार करताना लेखक सहजपणे न्यायाची भूमिका घेतो. परिणामी या पुस्तकाचे महत्त्व परखड आणि मार्मिक चिकित्सेतच आहे.