Summary of the Book
कविता म्हणजे निखळ आनंदाचे देणे, सारे उपरे उसने भाव बाजूला सारून अंतर्मुखतेने स्वतःशी बोलणे.
कवितेतला अगदी आतला सच्चा सूर वाचणारयाला जाणवला की तो अलगद 'स्व'चा उंबरठा ओलांडून दुसऱ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतोच ही अनुभूती प्रस्तुत कवितासंग्रहातील कविता वाचताना येते.
संवेदनशील माणूस जनात वावरतानाही आतून एकटा असतो. त्यावेळचे त्याचे भाव विचार प्रामाणिकपणे कवितेत प्रकट झाले तर ती कविता वाचकालाही आपलीशी वाटते. हा आपलेपणा याकावितासंग्राहतील कविता वाचताना जाणवतो.
निसर्गाचे विभ्रम टिपणारया कविता, आत्मपर उद्गाराच्या कविता, प्रेमकविता, मनाच्या अवकाशाचा वेध घेणाऱ्या भावकविता या सर्वांचा रसपूर्ण मेळ येथे आहे.
मुल्याविचारांचे भान सतत जागे असल्यामुळे वास्तवाच्या दर्शनाने मन घाबरले तरी त्याला उभारी देण्याचे आश्वासक बळही कवयित्री मनाशी जपून आहे.
एकूणच मनातील भावभावनांशी हितगूज करणारी ही कविता 'मनःपूर्वकते' ने रसिकांसमोर येते आहे. उत्तरोत्तर जीवनाचा परिपक्व आकार डॉ. वसुधा सरदेसाई यांच्या कवितेतून समूर्त व्हावा म्हणून खूप खूप शुभेच्छा.