Summary of the Book
समाजात कधी अशा काही घटना घडतात, की नंतर त्या घटनांवर विश्वास ठेवण्यास मन कचरते. माझ्या मते, कोणत्याही थरातील माणसाला गरिबी नेहमीच दुर्बळ करते आणि नंतर गरिबीच्या लाथा, बुक्क्या खाणारी ती व्यक्ती जेव्हा सुसंकृत समाजाकडून त्याच्या गरिबीबद्दल, त्याच्या जातीबद्दल, त्याच्या संस्कारांबद्दल उपेक्षिली जाऊन त्या सुसंस्कृत समाजापासून दूर फेकली जाते, तेव्हा त्या सुसंस्कृत समाजाबद्दल त्या व्यक्तीच्या मनात एक सुडाची भावना धगधगत असते व नंतर त्या सूडभावनेनेच ती व्यक्ती समाजाला हानिकारक अशी कृती करते, करीत राहते; परंतु त्यात अनेक निरपराधी माणसे विनाकारण भरडली जातात.
भुजंगराव माने हे असेच समाजाकडून उपेक्षिले गेलेले होते; परंतु नंतर समाजात त्यांना मानाचे स्थान मिळाले तरी त्यांच्या सूडभावनेतून ह्या कादंबरीची सुरुवात झाली.
रथचक्रवाड्याचे मालक भुजंगराव माने व त्यांची मुले, त्यांची आई, लसण्याची आई व त्या वाड्याच्या सर्व सुना ह्यांच्याभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. ते भुजंगराव व ती वाड्यातील सर्वच माणसे विकृत, पिसाट सैतानी वृत्तीची होती. कुणाचे हाल हाल करण्यात त्यांना एक विकृत आनंद मिळत होता व त्यांच्या वाड्यातील गरीब घरच्या सुनांना छळून तो विकृत आनंद पुन्हा पुन्हा घेत होती. जे तिथे घडले होते ते सर्व त्याप्रमाणे लिहिले गेले. त्या वाड्यातील ते क्रौर्य, त्यांची ती गलिच्छ भाषा, त्यांचे ते विकृत वागणे जसे होते तसेच सर्व या कादंबरीत लिहिले गेले. मृत कोमलच्या त्या सर्व दुःखदायक घटना मी ह्या कादंबरीद्वारे जगापुढे ठेवल्या, फक्त तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून!
- आयडा बॅरेटो