Summary of the Book
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीला माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल ? या प्रश्नांच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं 'संवाद' लिहिलं गेलं आहे. 'संवाद' या पुस्तकात चित्रलिपीद्वारा, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करून आदिमानवाच्या परस्परातल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायला लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाला आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात वाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील 'संवाद' मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉटसअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयी एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे संवाद! यामध्ये तुतारी, शिंग, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाईल फोन, फेसबुक आणि व्हॉट्सअप या सर्वांच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जन्मकथा आपल्याला 'संवाद' मध्ये खिळवून ठेवतील.