आपल्या भूमीत समता-न्याय-बंधुता हा स्वातंत्र्योत्तर भारताला मिळालेला आधुनिक संवैधानिक विचारच पुरता रुजला नाही किंवा जिथे अजून फुले-आंबेडकरांचा विचार पचनी पडला नाही तिथे पाश्चात्यांचा उत्तर आधुनिक विचार लगेच आमच्या पुरोगाम्यांना रुचला आणि पटलाही. तिकडचा हा 'डिस्टन ड्रम'चा आवाज यांच्या कानी लगेच पडतोय, पण इथल्या मातीतल्या जातीय क्रूर हिंसा, दलित स्त्रियांची विटंबना व माणूसपण नाकारणाऱ्या व्यवस्थेविरोधात मात्र यांच्या पेनातली जराही शाई खर्च होत नाही किंवा निषेधाचे सूर उमटत नाही. आजही यासाठी पुन्हा त्याच जातीचा पीळ सोसलेल्या तरुण कवीला, वैभव छायाला आपल्या व्यवस्थेचे दुःख जागतिक वेशीवर टांगण्यासाठी स्वतःचीच लेखणी स्वतःला उचलावी लागते, तुमचं तथाकथित 'डिलीट केलेलं आकाश' या कवितासंग्रहातून.