Summary of the Book
भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही किंवा शब्दांचा देवघेवीचा व्यवहारही नाही, तिच्याशी आपले मन, संचित आणि नाळ जोडलेली असते. अडीच हजार वर्षांची परंपरा असलेलीमराठी भाषा, तिचा उज्ज्वल इतिहास, चढ - उतार, उत्कर्ष, अवहेलना, कथा आणि व्यथाही. भाषेचा इतिहास नितीन शिंदे यांनी काव्यातून मांडलाय. अगदी अश्मयुगापासून सातवाहनापर्यंत, ज्ञानेश्वरांपासून स्वराज्य संस्थापक शिवाजीमहाराज, स्वराज्यरक्षक संभाजीमहाराजांपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा, समृद्धीत भर घालणाऱ्या विभूतींच्या गाथा. मराठीची सद्य:स्थिती या सगळ्यावर अभ्यासपूर्ण विवेचन होऊ शकेल, अशा कविता आहेत. सगळ्यात शेवटी मराठी भाषेची सुंदर आरतीही आहे. गड, किल्ले, वारकरी, धारकरी, साहित्य, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, खाद्यसंस्कृती, लोककला, क्रिडा, विज्ञान कितीतरी वेगवेगळ्या विषयावर या संग्रहात कविता आल्या आहेत. भाषेची अस्मिता, तिचा गोडवा हा कुठेही सुटलेला नाही. हे एक पुस्तक वाचल्यावर मराठी भाषेच्या इतिहासाचा वेगळा अभ्यास करायला नको. इतके हे पुस्तक सर्वांगसुंदर झाले आहे.
उगमाच्यावेळी छोटी असणारी नदीची धार अशी विस्तारत जाते, तिचा विस्तृत प्रवाह तयार होतो तसेच भाषेचे आहे. या प्रवाहाला जपण्याचे भान मराठी भाषिकांना यायला हवे. लोकजागराचे काम हा कवितासंग्रह करेल अशी खात्री आहे. आपल्या मातृभाषेसाठी काळीज पसरून आपणच पायघड्या घालायला हव्यात.
नितीन शिंदे यांचं कौतुक करायला हवं. प्रेम, निसर्ग, समाज याऐवजी त्यांनी भाषेचा इतिहास मांडलाय, तोही अशावेळी ज्यावेळी मराठी 'अभिजात भाषेच्या दर्जासाठी' पायरीवर दार उघडण्याची वाट पाहत उभी आहे.