Summary of the Book
प्रमोद केणे
जगाच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी एकरूप होऊन 'दत्तावतार ' घेतला. कलियुगात दत्तभक्ती श्रेष्ट मानली आहे. गुजरातमधील जुनागढजवळचा गिरनार पर्वत हे दत्तमहाराजांच्या जागृत स्थानापैकी एक. दहा हजार पायऱ्या व साडे तीन हजार फूट चढून गेल्यावरच स्वयंभू दत्त पादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्व प्राचीन काळापासून आहे. श्री. प्रमोद केणे, विज्ञानाचे पदवीधर सांसारिक व एक छोटे उद्योजकही. दत्तभक्तीची ज्योत अंतरी निर्माण होऊन १-२ नव्हे तर चक्क १०८ गिरनार यात्रा त्यांच्याकडून घडल्या. त्याही कशा ? तर, सलग, अखंडीत, दर पौर्णिमेला, रात्रीच पर्वत चढून, कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा, कोसळता पाऊस, धंद्यातील संकटे, तीव्र आर्थिक अडचणी, कशाचीही पर्वा न करता. भगवतकृपेच्या आड येणारी बंधने तोडणे हीच साधना. श्रद्धा-भक्ती यांच्या बळावर आपण काय करू शकतो याचे उदाहरण.
श्री. केणे, श्रद्धा, भक्ती, अनुभूती व विज्ञान यांचा संगम आहे. ४ जून २०१२ रोजी हा संकल्प संपन्न झाला. या गिरनार यात्रांत श्री. केणेंणा विलक्षण अनुभव येत गेले. ते त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर तोलले. या ईश्वरी लीलातील मर्म शोधून ते या लीलेतच सहभागी झाले. यातील काही मोजके अनुभव ते भक्तिमार्गावर असलेल्या साधकांसाठी पूर्वआदेशानुसार मोकळे करीत आहेत. इथे शांत रसाच्या भेटीला अद्भूत रस आला आहे. ही कथा सर्व इंद्रिये कानाशी एकत्र करून हळुवार चित्ताने ऐकावी. अविवेकाची काळजी फेडावी व जीवनयात्रा सफल करण्याचा प्रयत्न करावा.
"सद्गुरू प्रसादे पावन झालो, दत्तमयी जाहलो."
श्री. प्रमोद केणे हे विज्ञानाचे उच्चशिक्षित पदवीधर असून आपल्याप्रमाणेच सांसारिक आहेत. त्यांनी काही काळ छोटा रासायनिक उद्योगही यशस्वीपणे चालवला होता. याचबरोबर उत्कट दत्तभक्ती, अनामिक प्रेरणा व अद्भुत संकेत यांमुळे त्यांच्या जीवनप्रवाहाला विलक्षण कलाटणी मिळत गेली. अशाच प्रेरणेने त्यांनी दर पौर्णिमेस एक याप्रमाणे १०८ गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला. त्यानंतरही श्रीदत्तकृपेने दर पौर्णिमेची त्यांची गिरनार यात्रा आजही अखंडपणे चालू आहे. आजपर्यंत त्यांनी पौर्णिमा आणि पौर्णिमेव्यतिरिक्त दोनशेच्या वर वाऱ्या केल्या आहेत. या काळात त्यांचा कस पाहणारी कितीतरी संकटे आली. धंद्यातील क्लेश, आर्थिक कोंडी, यात्रेदरम्यान प्रतिकूल हवामान - एक न दोन असे अनेक प्रसंग; भक्ति आणि श्रद्धेची कसोटी पाहणारे. पण त्यांचा निश्चय कधीच ढळला नाही. "सदा सर्वदा देव सानिध्य आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'', हेच खरे. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे गिरनारची एकेक पायरी तुम्हाला दुर्गुणाची एकेक वस्त्रे सोडायला लावते, शिकवते हे त्यांनी अनुभवले.
श्रद्धेतून प्रेरणा, प्रेरणेतून अनुभूती, अनुभूतीतून दर्शन असा हा प. पु. श्री. केणे काकांचा प्रवास आहे. यातूनच दत्तभक्तीचा प्रसार आणि सामान्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन याचा वसा त्यांनी स्वीकारला. तसेच श्रीदत्त आदेशानुसार लोककल्याणासाठी शिवदत्त मंदिराची स्थापना (चौल, जिल्हा रायगड) मासिक याग स्वतःच्या अनुभूतीवर आधारित प्रवचने आणि साधकांना मार्गदर्शन असे त्यांचे बहुआयामी कार्य चालू आहे.
या दीर्घ प्रवासात प. पु. श्री. केणे काकांना ईश्वरी लीलेचे अनुभव येत गेले व येत आहेत. हे अनुभव हेच मार्गदर्शन. असे मोजके अनुभव ते सांगत आहेत व आपल्यालाही या लीलेत सहभागी करून घेत आहेत. हे केवळ चमत्कारिक वर्णन नव्हे, हे अधात्माच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्यांना अनमोल मार्गदर्शन आहे . त्याचा साधकांना निश्चित लाभ होईल.
"सद्गुरू प्रसादे पावन झालो, दत्तामयी जाहलो."