Summary of the Book
दुसऱ्याला काही तरी सांगावंसं वाटण्याच्या घुसमटीतून कथा-कविता लिहिल्या जातात. फक्त जे साठवलेलं आहे ते किती कल्पकतेने, लक्षवेधीपणे सांगितलं गेलंय हे महत्त्वाचं आहे. नारायण लाळे यांनी या आधी आपल्या 'गर्भ' या कथासंग्रहाद्वारे कथाप्रकार समर्थपणे हाताळलेला आहे. तीन दशकानंतर ते 'काजवा' या कथासंग्रहाच्या माध्यमातून रसिकांसमोर आलेले आहेत. काजवा संग्रहातल्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या प्रत्येक कथेत प्रेमाचा त्रिकोण, स्त्री-पुरुष संबंध यात अडकून न राहता ते मानवी जगण्याच्या विविध पैलूंना भिडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातल्या कथा वाचकाला चकित करतात, अंतर्मुख करतात, सामाजिक जबाबदारीचं अप्रत्यक्ष सूचनाही करतात. उत्कटता आणि कल्पकतेमुळे लेखकाची भाषा घेऊन न येत कथेची भाषा घेऊन कथा येते. वाचकाच्या मनात नव्याने सर्जनशीलता निर्माण करत अर्थाच्या अनेक शक्यता वृद्धींगत करते. वाचकांच्या सर्जनशीलतेला स्पेस देणं हे लाळेंच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. काही कथा वाचकाला विचारप्रवण करतात, आस्वादाचा अवकाश देतात. प्रदीर्घ काळानंतर कथासंग्रह आल्यामुळे कथेत एक प्रकारचा मुरलेपणाआहे. कोणत्याही फापटपसाऱ्याशिवाय कथा एकसंधपणे उलगडत जातात. लाळे यांच्या कथेला स्वतःचा घाट आहे. कथानकाला स्वतःची गती आहे, क्रम आहे. कथांना स्वतःचा प्राण असल्यामुळे वाचून झाल्यावर वाचकाला पात्रांविषयी कुतूहल आणि आश्चर्य वाटत राहतं. भाषेच्या सहजपणामुळे आणि सहजगतेमुळेही कथा वाचल्यानंतरही बराच काळ आपल्याबरोबर राहतात, मनात रुंजी घालत राहतात किंबहुना परिपूर्ण करतात हे महत्वाचं.