Summary of the Book
परमेश्वराचा वरदहस्त लाभलेला अस्थिशल्यचिकित्सक म्हणून येणार्या पिढ्या डॉ. संचेतींना ओळखतील, यात शंका नाही. ते जसे श्रीमंतांचे मित्र आहेत; तसेच गरीब, निराधार आणि वंचितांचे तारणहार आहेत. अंधारात जीवन जगणार्यांच्या आयुष्यात आशेची पहाट फुलवणारे, पीडितांना आरोग्यदान देणारे म्हणून डॉ. संचेती कायम स्मरणात राहतील. आपली दैनंदिन कर्तव्ये पार पाडत आणि रुग्णांना स्वास्थ्य प्रदान करत त्यांची वाटचाल आजही एखाद्या यात्रेकरूप्रमाणे चालू आहे.
- दादा जे. पी. वासवानी
आध्यात्मिक गुरू, साधू वासवानी मिशन.
डॉ. के. एच. संचेती यांच्या रूपाने जगातील एक सर्वोत्कृष्ट अस्थिशल्यचिकित्सक आपल्याला गवसला, हे आपल्या देशाचे भाग्यच म्हणायला हवे. डॉक्टर जागतिक दर्जाचे अस्थिशल्यचिकित्सक तर आहेतच, शिवाय ते नवीन कल्पनांच्या वेडाने झपाटलेले एक संशोधक आहेत. त्यांचे अवघे आयुष्यच प्रत्येकाने अनुकरण करावे असे आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर
माजी महासंचालक, ‘सी.एस.आय.आर.’
अध्यक्ष - ग्लोबल रिसर्च अलायन्स
डॉ. संचेती यांनी आजवर विद्यार्थी राहूनच ज्ञान मिळवले आहे आणि आपले ज्ञान, अनुभव विद्यार्थ्यांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये मुक्तहस्ते वाटले आहे. त्यांना एवढी कीर्ती आणि मानसन्मान मिळूनही ते अत्यंत साधे आणि नम्र आहेत.
- बी. जी. देशमुख
माजी कॅबिनेट सचिव, भारत सरकार
डॉ. संचेतींकडे दूरदृष्टी आहे आणि या दृष्टीला दिसणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे कष्टकरी हातही त्यांच्याकडे आहेत.
आज म्हणूनच ते काळाच्या पुढे आहेत. कायम घाईत असणार्या डॉक्टरांना अद्याप बर्याच गोष्टी करायच्या आहेत. हे पुस्तक या सगळ्याविषयी आणि आणखीही बरेच काही सांगते.
- राहुल बजाज
प्रख्यात उद्योजक
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज उद्योग समूह
कांतिलाल दीर्घोद्योगी आहे. सतत काम करण्यावर त्याचा विश्वास आहे. व्यवसायाप्रति त्याची कडवी निष्ठा आहे. त्याच्या या गुणांमुळेच त्याच्या कुटुंबाला, त्याला आणि त्याच्या संस्थेलाही घवघवीत यश मिळाले आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचेच, या अटळ निश्चयापायी त्याने वाटेत आलेल्या अवघड अडथळ्यांचा सामना कसा केला,
ते या पुस्तकातून कळते.
- डॉ. चित्तरंजन राणावत
न्यूयॉर्कस्थित जागतिक कीर्तीचे अस्थिशल्यचिकित्सक
डॉ. के. एच. संचेती
एम.एस. (ऑर्थो), एफ.आर.सी.एस. (एडिन्बरो) यू.के.,
पीएच.डी. ऑर्थो, एफ.आय.सी.एस., एफ.ए.सी.एस. (यू.एस.ए.)
डॉ. के. एच. संचेती हे ख्यातनाम अस्थिशल्यचिकित्सक आणि ‘संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन’चे संस्थापक आहेत. त्यांची ही संस्था दक्षिण-पूर्व आशियातील सर्वांत मोठे ‘सिंगल स्पेशॅलिटी हॉस्पिटल’ म्हणून ओळखली जाते. डॉक्टर या संस्थेचे संचालक आणि प्रमुख अस्थिशल्यचिकित्सक आहेत. ‘अस्थिरोगातील पुनर्वसन’ आणि ‘वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन’ या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या भरीव योगदानासाठी भारत सरकारतर्फे त्यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’, २००३ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१२ मध्ये ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तसेच २०१३ मध्ये डी. लिट्. ही सन्माननीय पदवी प्रदान करून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
डॉक्टरांनी भारतातील सामान्य आणि गरजू लोकांसाठी अस्थिरोग साधनांची निर्मिती केली आहे. ‘इंडस’ या देशातील पहिल्या भारतीय बनावटीच्या गुडघेरोपण यंत्रणेचे ते जनक आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे आणि भारतीय संरक्षणदलाचे ते मानद अस्थिशल्यचिकित्सक आहेत. बर्याच वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ते उच्चपदे भूषवत आहेत. स्वयंअध्ययनाच्या बळावर त्यांनी हॉस्पिटलची रचना आणि नियोजन या विषयात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. देशातील अनेक हॉस्पिटल्सना या विषयात त्यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे. आज पंचाहत्तराव्या वर्षीही त्यांचे संशोधनाचे आणि शल्यचिकित्सेचे काम अथकपणे चालू आहे. आरोग्यसेवेचे त्यांचे हे कार्य सेवाभावी वृत्तीने सुरू आहे.
एखादा माणूस आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गगनाला कशी गवसणी घालतो, ते हे पुस्तक सांगते आणि तसे काम करण्याची प्रेरणाही देते.