Summary of the Book
लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी संत कवयित्रींची मुक्तिसंकल्पना आणि स्त्रीमुक्ती या मध्यवर्ती संकल्पनेविषयीचे सहा लेख या संग्रहात एकत्रित केले आहेत. संशोधकाचा पिंड असल्याने या पुस्तकामागची भूमिका आणि समारोप-संदर्भसूची-परिशिष्टे यांचीही जोड दिलेली आहे. १९९४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. भारतातील संत चळवळ ही सामाजिक मुक्तीची चळवळ होती.
परंपरेच्या शृंखला पायात अडकवून चार भिंतीच्या आतच ठेवलेल्या स्त्रियांना आत्मस्वर देण्याचा प्रयत्न या चळवळीतील संत कवयित्रींनी केला. तो करताना त्यांनी सामाजिक शोषणाच्या आणि स्त्री शोषणाच्या विरोधात कुठल्या प्रकारे बंडखोरी केली, त्याची चर्चा या पुस्तकामध्ये भवाळकर यांनी केली आहे. त्या वेळची परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी आणि कर्मठ होती, त्यामुळे त्याविरोधातल्या बंडखोरीची हत्यारेही वेगळी होती.
एका स्वतंत्र प्रकरणात भवाळकर यांनी आजच्या स्त्रीचळवळीचा या संत कवयित्रींच्या चळवळीशी काय अनुबंध आहे, याचाही ऊहापोह केला आहे. त्यामुळे स्त्री चळवळीच्या अभ्यासकांपासून सर्वसामान्य महिलांपर्यंत ते सुशिक्षित महिलांपासून अशिक्षित महिलांपर्यंत- ज्यांना या विषयात रस आहे, त्यांना हे पुस्तक स्वारस्यपूर्ण वाटू शकेल.