Summary of the Book
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गानं घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात. भारतीय लष्कराची ही कायमची डोकेदुखी बनली आहे. तथापि, ही घुसखोरी पूर्णपणे नसली, तरी अल्पांशानं का होईना, बंद व्हावी आणि पाकिस्तानला परस्पर धडा मिळावा, यासाठी भारत सरकारच्या मंजुरीनंतर लष्करानं 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश करून त्यांच्या सीमेवरच्या चौक्यांवर यशस्वी हल्ला केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चंदू चव्हाण हे भारतीय जवान, दिशाहीन झाल्यानं हद्द ओलांडून पाकिस्तानात गेले. तिथं त्यांना पकण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झाली पाकिस्तानच्या लष्करी तुरुंगातली क्रौर्याची मालिका.
कोणत्याही देशात शत्रूचा एक किंवा अनेक सैनिक पकडण्यात आले, तर जीनिव्हा करारानुसार प्रिझनर ऑफ वॉर म्हणून समजलं जातं आणि त्यांना तुरुंगात टाकलं जातं. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्यांचा छळ करण्याचा अधिकार त्या देशाला किंवा त्यांच्या लष्कराला नसतो. मात्र, असं असतानाही अनवधानानं पाकिस्तानच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या तुरुंगात अतोनात आणि अमानुष छळ केला. चंदू चव्हाण यांनी तो निधड्या छातीनं सहन केला. बेदम मारहाण होऊनही ते "भारत माता की जय' असा जयघोष करत या छळाला सामोरे जात होते. तब्बल तीन महिने 21 दिवस त्यांनी हा छळ सहन केला. अखेर 21 जानेवारी 2017 रोजी त्यांची या नरकयातनांतून सुटका झाली.
चंदू चव्हाण, त्यांचा मोठा भाऊ आणि बहीण अत्यंत गरीब परिस्थितीत वाढले. आई-वडिलांच्या निधनानंतर ते आजोळी राहू लागले. मोठा भाऊ लष्करात भरती झाल्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून, चंदूही लष्करात दाखल झाले. लष्कराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची रवानगी सांबा सेक्टरमध्ये झाली. याच परिसरातल्या एका सीमेवर असताना, चंदू चव्हाण यांच्याबाबत वरील घटना घडली. सुबुद्ध माणूस विचारही करू शकणार नाही, अशा क्रूर पद्धतीनं त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. मारहाण करण्यात आली. शरीरभर सिगारेटचे चटके देण्यात आले. अंधाऱ्या काळकोठडीत असताना त्याच्यासारखेच बंदीवान झालेल्या इतर कैद्यांना होत असलेली मारहाण आणि त्यांचे भयकंपित करणारे ध्वनी त्याच्या कानांवर नित्य पडत होते.
पाकिस्तानच्याच एका सैनिकाच्या एका बेसावध वक्तव्यामुळं, चंदू चव्हाण पाकिस्तानी लष्कराच्या कैदेत असल्याची बातमी त्या देशातल्या "द डॉन' या एक प्रथितयश दैनिकानं प्रसिद्ध केली आणि दबाव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा इन्कारही केला. मात्र, बाण सुटला होता. भारतात हे वृत्त पसरताच देशभर संतापाची लाट उसळली आणि चंदू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली. सरकारी पातळीवर हा प्रश्न गांभीर्यानं घेतला गेला. पाकिस्तान सरकारवरचा दबाव वाढल्यानंतर चंदू यांची सुटका करण्याशिवाय त्यांच्यापुढं अन्य पर्यायच उरला नाही आणि अखेर चंदू चव्हाण यांची सुटका झाली. त्याच्या सुटकेसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी विशेष प्रयत्न केले.
पाकिस्तानातल्या लष्करी तुरुंगात चव्हाण यांच्यावर झालेल्या छळावर आधारित असलेलं हे पुस्तक, पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिलं आणि ईश्वरी प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलं. हे छोटेखानी, थरारक पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं. आंतरराष्ट्रीय नियमांची पाकिस्तानात कशी पायमल्ली होते, हे या पुस्तकामुळं पुन्हा एकदा स्पष्ट होतं. हे पुस्तक मराठीबरोबरच हिंदीतूनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पाकिस्तानातले तुरुंग आणि त्यातल्या कैद्यांची अवस्था काय होते याचा ज्वलंत अनुभव घेण्यासाठी, प्रत्येक भारतीयानं ते वाचलंच पाहिजे.