Summary of the Book
गंगा-यमुना या भारताच्या जीवनरेखा, जीवनधारा आहेत असे मानले जाते. भारतीय संस्कृतीचा त्या अविभाज्य भाग मानल्या जातात. या पवित्र नद्यांची सांप्रत अवस्था मात्र शोचनीय म्हणावी अशी झाली आहे. प्रदूषणाने त्यांना विळखा घातला आहे. त्यामुळे या नद्या वाचवण्यासाठी 'जोहड'वाल्या डॉ. राजेंद्रसिंह यांनी संघर्ष मोहीम हाती घेतली आहे. त्या संघर्षांची ही कहाणी आहे. पाण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह देत असलेला लढा आता सर्वाच्या परिचयाचा आहे; पण त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, सोसलेल्या हालअपेष्टा मात्र अजून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जीवघेणे हल्ले, राजस्थान सरकारने केलेल्या ३५० केसेस, अशा संकटांचा सामना करत राजेंद्रसिंहांनी आपला लढा चालू ठेवला. हळूहळू त्या लढय़ाचे मोठय़ा चळवळीत रूपांतर झाले.
प्रस्तुत पुस्तकात सुरेखा शहा यांनी गंगा-यमुनेच्या संघर्षांसाठी राजेंद्रसिंहांनी केलेले काम सांगत असतानाच राजेंद्रसिंहांचा जीवनप्रवासही सांगितला आहे. कादंबरीसारखी त्यांनी ही कथा लिहिली आहे. त्यामुळे त्यातून साल, घटना यांची नेमकी माहिती मिळत नाही, पण तरीही हे पुस्तक वाचावे असे आहे.