Summary of the Book
प्रेम, विरह, प्रतारणा इत्यादी नाजूक भावनांखेरीज ही कवयित्री आणखी काही वेगळ्या अनुभवांनाही शब्दांकित करते. हे 'शहर कपालभारती करतंय' , 'सिटी वयात येतेय' असे तिला वाटते. 'निसर्गाच्या फिटनेस'चाही ती विचार करते. अध्यात्माचे जुने अर्थ नव्या संदर्भात जाणून घेण्यास ती उत्सुकता आहे. एक तीळ सात भावांनी वाटून खाल्ल्याच्या गोष्टीचे संस्कार तिला स्वार्थी होऊ देत नाहीत. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने बाळपावलांत बेड्या ठोकल्यामुळे दडपशाहीपुढे तिची लेखणी सरेंडर होत असली, तरी आपत्कालीन अग्निशामक सुविधेची सोय ती करून ठेवते. स्वतःच्या अस्तित्वाचा चेहरा शोधणाऱ्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या ह्या कवयित्रीच्या मनगटामध्ये आत्मविश्वासाच्या विटांचा ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करण्याची ताकद आहे.
कीर्ती पाटसकर ह्यांच्या 'लेखणी सरेंडर होतेय' हा ७० कवितांचा संग्रह आशय, विषय, मांडणी आणि शैली अशा अनेक दृष्टींनी महत्त्वाचा ठरेल असा आहे. त्यांची कविता आक्रमक नाही तरी शब्दांना धार आहे. त्यामुळे कविता नेमका वार करणारी आहे. साध्या आशयातही वेगळा आणि आशादायी विचार करणारी ही कवयित्री आहे.