Summary of the Book
प्राचीन मराठी वाङ्मयात संतकवयित्रींनी मोलाची भर घातली आहे. आद्य कवयित्री महदंबा, संत परंपरेतली जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई यांसारख्या अनेक कवयित्रींनी मराठी वाङ्मयात अमिट ठसा उमटविला आहे. डॉ. शैला गावंडे लिखित ‘दहा संतकवयित्री’ या पुस्तकातही या संतकवयित्रींच्या साहित्य संपदेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आला आहे.सुरुवातीला संत व संतसाहित्याचे विश्लेषण लेखिकेने केले आहे. संत म्हणजे काय? इथपासून ते संतसहित्याची व्याप्ती, संतांनी केलेले संतांचे वर्णन, संतसाहित्यातील नाममहिमा व गुरुगौरव, संतसाहित्याचा उद्देश, संतसाहित्याचे स्वरूप याविषयाचे विश्लेषण पुस्तकात येते. यादवकाळातील महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई या प्रमुख संतकवयित्रींविषयी माहिती देताना यादवकालीन परिस्थिती काय होती, याची ओळख लेखिका करून देते. तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थितीचा आढावा लेखिकेने या प्रकरणात घेतला आहे.
मराठी संतकवयित्रींबरोबरच वेणाबाई व अन्य कवयित्रींविषयीची माहिती, त्यांची लेखनवैशिष्टय़े लेखिका सांगते. या संतकवयित्रींविषयी वाचताना त्या ज्या काळात होत्या, त्या काळाच्या दृष्टीने खूपच प्रगल्भ, विचारी होत्या हे या पुस्तकातून जाणवते. मराठी संतकवयित्रींविषयी परिपूर्ण विश्लेषण करणारे असेच हे पुस्तक आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांबरोबरच संतसाहित्याची आवड असणार्यांनाही हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरेल.