shilpa kulkarni
26/11/2018
‘कोकण मिडिया’चा दिवाळी अंक हातात पडला आणि जो काही आनंद झाला. विचारूच नका. खूप पूर्वी माझ्या कविता पेपरमध्ये छापून आल्या होत्या, पण ते आता फार फार वर्षांपूर्वी सारख्याच्या गोष्टीसारखं झालं.
दिवाळी अंक हातात मिळण्यापूर्वी मी अनिकेत सरांना सारखं ‘तुम्ही कधी पुण्यात येणार? अंक मला कधी मिळणार?’ असं विचारून भंडावून सोडत होते. शेवटी एकदाचा त्यांचा मेसेज आला की, ‘मी पुण्यात उद्या सकाळी येणार आहे आणि सकाळी भेटून तुम्हाला अंक देतो.’ आणि मला हुश्श वाटलं कारण मी दुपारीच कोल्हापूरला जाणार होते.
फक्त माझा लेखच नव्हे, तर सगळा अंक नीट चाळला. मुखपृष्ठ व आतील सर्व अंकाची मांडणी अतिशय सुबक व सुंदर आहे. कोकणातील जलवैभव हा या अंकातील प्रमुख विषय असून त्यावरील सर्वच लेख अतिशय सुंदर आहेत.
‘सुखाची सावली’ हा अनिकेत कोनकरांचा लेख भावला कारण माझं माहेर व आजोळ पण सिंधुदुर्गच. मे महिन्यात फोंड्यातून सावंतवाडी, गोवा असं फिरून आलो तेव्हा या रस्ता चौपदरीकरणाचं काम जोरात सुरू होतं. झाडी नसल्याने या भागात आता रुक्षपणा जाणवत होता, पण इलाज नाही.
कोकण मीडियाचा दिवाळी अंक खूपच छान वाटला. कोकणाच्या पर्यटनाबरोबरच संस्कृती आणि स्थानिक साहित्याचा रसास्वाद या अंकातून घेता आला. कोकणाशी संबंध असलेल्यांच्या आठवणी जागवणारे आणि कोकणाबाहेरच्यांना हे अनुभव घ्यावे असे वाटायला लावणारे लेख या अंकात आहेत. रत्नागिरीत सापडलेल्या कातळशिल्पांवरील लेख अप्रतिम आणि नावीन्यपूर्ण आहे. कुंटुंबातील प्रत्येकासाठीच मेजवानी म्हणजे कोकण मीडियाचा जलवैभव दिवाळी अंक असं म्हणावसं वाटतं.