Vishal Potdar
12 Dec 2019 05 30 AM
नुकतंच निलिमा हे पुस्तक मनसोक्त वाचून हातावेगळं केलं. त्यांनी हे पुस्तक लिहिलं असं मी म्हणणार नाही, तर ते सांगितलंय. असं वाटते की एखाद्या थंडीच्या रात्री, त्या आलापल्ली नावाच्या छोट्याशा खेड्यात आपण पाच-सहा लोक शेकोटीभोवती गप्पा मारत बसलोय आणि निलिमाताई तिच्या लहानपणीच्या आठवणी, गमती जमती सगळ्यांना सांगतेय. ऐकता ऐकता आपण त्या आठवणींचाच जणू एक भाग होऊन जातो, हे feeling पुस्तक वाचताना पाना पानामधून येणं, ही तिच्या लेखनाची ताकद.
मुखपृष्ठावरूनच आलापल्लीचं निसर्ग सौंदर्य नजरेत भरतं. पण त्या खेड्याचं सुमधुर वर्णन तिच्या कथनातून आपल्याला निसर्गाच्या अगदी कुशीत नेऊन ठेवतं. तिथल्या वास्तव्याची काही वर्षे , तिथल्या विलक्षण व्यक्तींच्या किंवा प्रसंगांच्या वर्णनातून उलगडत नेतात. त्यात मग हास्याचे फवारे, सुंदर निसर्गाचे आभास आणि काही क्षणी भावनिक करून जाणारे क्षण ह्यातून पुस्तक मनाची पकड घेते. वाचताना असं वाटून गेलं की भलेही आपल्याला अशा गावात बालपण नाही गेलं पण आयुष्यात पुढे तरी पाहायला मिळावं.